आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पहिल्यांदाच तिनं एखाद्या मुद्यावर आपले परखड मत मांडले आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चित्रपटासाठी दिलेल्या एका मुलाखतीत साईने धर्म आणि हिंसा यावर केलेलं वक्तव्य आता चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. तिने काश्मीर फाईल्स मध्ये दाखवलेल्या हिंसेची तुलना मॉब लिचिंग सोबत केली आहे.
‘विराट पर्वम’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, साईला धर्म आणि हिंसेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, ‘काश्मीर फाईल्स चित्रपटात दाखवण्यात आलंय की काश्मिरी पंडितांवर अन्याय करून त्यांची हत्या करण्यात आली.
पण जर हिंसेला धर्मासोबत जोडलं तर… अलिकडेच जिथं गायी घेऊन जाणाऱ्या एका वाहनाच्या मुस्लीम चालकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. आणि त्याला ‘जय श्रीराम’चे नारे द्यायला भाग पाडलं होतं. या दोन्ही घटनांमध्ये काय फरक आहे?” असा सवाल साई पल्लवीने केला आहे.
मी कोणत्याही विचारधारेने प्रभावित नाहीये. मी डाव्या विचारांची नाही आणि उजव्या विचारांची देखील नाही. पण समाजात ज्या वर्गाला दाबलं जातंय त्यांची रक्षा केली गेली पाहिजे. कोणत्याही भेदभावा शिवाय. मग तो व्यक्ती डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचा असला तरीही.’
आपण एक चांगले व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. आपण चांगले असू तर दुसऱ्याला त्रास देण्याचा विचारही आपल्या मनाला शिवणार नाही. न्याय डावं उजवं नाही बघत. मोठा वर्ग समाजातील छोट्या वर्गाची पिळवणूक करतोय. हे चुकीचं आहे. लढाई दोन्ही बाजूनी बरोबरीची हवी. अशा शब्दात साईने परखड मत व्यक्त केलं.
साईचा ‘विराट पर्वम’ १७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वीच तिने केलेलं एक वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.