स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या पुन्हा एकदा भरारी घेत आहे. मालिकेत सध्याचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक ठरत आहे. कथानकातील ट्विस्टनंतर आता मालिका टीआरपी शर्यतीत देखील बाजी मारत आहे. मालिकेत सध्या यशवर खोट्या खुनाचा आरोप लागल्याचा ट्रॅक सुरु होता. याच निमित्ताने संपूर्ण देशमुख कुटुंब जवळ आलं आहे. यातच आपल्या मुलांना संकटातून बाहेर काढताना पुन्हा एकदा अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात आपुलकी निर्माण झाली आहे.
यश देशमुख यांच्यावर नील कामत याचा खून केल्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र, आता यश त्यातून निर्दोष सुटला आहे. केवळ, गुन्हा लपवण्यासाठी आणि यशला फसवण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचे अरुंधतीने सिद्ध केले आहे. देशमुख आणि गोखले कुटुंबाच्या मेहनतीमुळे यश तुरुंगातून आणि या आरोपांमधून निर्दोष मुक्त होऊन बाहेर पडला आहे.
नेमकं काय झालं होतं?
यश आणि ईशा, गौरी व मित्र-मैत्रिणींसोबत अनिरुद्धच्या मित्राच्या फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेले होते. या फार्महाऊसवर त्यांचा अनिरुद्धच्या मित्राचा मुलगा नील देखील होता. ईशाला पाहताच क्षणी त्याच्या मनात विकृत इच्छा जागृत झाल्या. कुणाचेही लक्ष नसताना त्याने ईशाला एका खोलीत डांबून तिच्या अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचवेळी यश ईशाला शोधात तिथे पोहचल्यामुळे ईशाला वाचवताना दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.
जवळचा चाकू उचलून नील यशला मारणार, इतक्यात यशने खाली पडलेला रॉड उचलून नीलच्या डोक्यात मारला होता. यावेळी नील मेला असं समजून यश आणि ईशा तिथून निघाले होते. मात्र, काहीवेळानंतर तिथून नील गायब झाला होता. यानंतर यशनेच त्याचा खून केला असा आरोप लावण्यात आला होता. या आरोपाखाली त्याला पाच दिवसांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, नील कामात जिवंत असून, त्याचा गुन्हा लपवण्यासाठी तो आपल्या मुलाला यात अडकवतो आहे, हे अरुंधतीने सिद्ध केलं आहे.
View this post on Instagram
मुलांच्या काळजीपोटी अनिरुद्ध-अरुंधती एकत्र येणार?
यशला या प्रकरणातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी अरुंधतीसोबतच अनिरुद्धने देखील कंबर कसली होती. आपल्या मुलांना मानसिकरित्या कोलमडताना पाहून अरुंधती देखील खचली होती. यावेळी अनिरुद्धने तिला आधार दिला. आपल्या मुलांना यातून बाहेर काढू असा विश्वास त्याने दिला. यामुळे आता मुलांच्या भविष्यासाठी अरुंधती आणि अनिरुद्ध पालक म्हणून नेहमी एकत्र उभे राहणार आहेत.