सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयासोबतच त्यांच्या इतर कलागुणांमुळे ओळखले जातात. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सुद्धा याच पंक्तीत बसतो. संकर्षण कऱ्हाडे केवळ एक उत्तम अभिनेताच नव्हे, तर संवेदनशील कवी आणि निवेदक सुद्धा आहे. त्याच्या कविता ऐकायला मिळणे म्हणजे काव्यप्रेमींसाठी पर्वणीच. तो जेव्हाही एखाद्या कार्यक्रमासाठी गेला असता त्याला नेहमी कविता म्हणण्याचा आग्रह केला जातो. पण एक वर्ष झालं संकर्षणने कविताच केली नाही. याच गोष्टीची उणीव भरून काढण्यासाठी त्याने चाहत्यांना एक कविता ऐकवली.
View this post on Instagram
वर्षभर संकर्षण नाटक आणि मालिकांमध्ये पूर्ण व्यस्त होता. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्याने केलेली समीर ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ‘देवा शपथ’ या मालिकेनंतर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या माध्यमातून संकर्षण पाच वर्षानंतर मालिकाविश्वात परतला. नुकताच त्याचा या मालिकेतील शेवटचा सिन चित्रित झाला. या वर्षी तो ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात प्रेक्षकांना दिसणार आहे. इतकेच नव्हे तर, वर्षा उसगांवकर आणि प्रशांत दामले यांची भूमिका असलेले ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकाचे दिग्दर्शनही संकर्षण करत आहे. नाटकाचे प्रयोग, परदेशी दौरे, मालिकेच्या शुटिंगमुळे कविता करण्यास वेळ मिळत नसल्याचे त्याने कबूल केले.
खूप दिवसांनी संकर्षणने आपली कविता ऐकवण्यासाठी वेळ काढला. जुळी मुलं असल्याने त्यांना मोठे होताना पाहताना बाप म्हणून त्याला काय वाटते याची कविता प्रत्येकाच्या मनातील भावना आहे असेही तो सांगतो. ‘मोठं व्हायचं तर व्हा ना.. इतकी घाई काय’ ही त्याची कविता फारच सुंदर आणि बोलकी आहे. या कवितेवर नेटकऱ्यांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला. मागील वर्षी कोरोनामुळे प्रवासास मनाई होती तेव्हा त्याने केलेली ‘पंढरीचा विठुराया’ ही कविता फार गाजली. आता त्याने आपल्या कवितेद्वारे पालकांच्या मनातील भाव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.