सोशल मीडिया हा फक्त मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म नाही तर आपल्या लाडक्या कलाकारांना जाणून घेण्याचा मार्ग आहे. कलाकारही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चांगल्या वाईट सर्व गोष्टी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
२०२२ मध्ये धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून खूपच अनपेक्षित गोष्ट शेअर केली. त्यावेळी त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. धनुष आणि ऐश्वर्याने २००४ मध्ये लग्न केले. त्यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत. त्यांच्या या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला. त्याचे कारणही तसेच होते, ते दोघेही त्यांचे १८ वर्ष जुने नाते कसे तोडणार यावर लोकांचा विश्वास बसेना.
धनुष आणि ऐश्वर्याने त्यांच्या दोघांचे हे अतूट नाते तोडण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनी यावर्षी जानेवारीत घटस्फोटाची घोषणा केली. पण ऐश्वर्याचे वडील साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनी या दोघांमध्ये समेट घडवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. आणि आता कुठे त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे समजते आहे.
रजनीकांत यांनी समजूत घातल्यामुळे धनुष आणि ऐश्वर्या त्यांचा संसार वाचविण्यासाठी तयार झाले आहेत. आता त्यांनी देखील त्यांच्या नात्याला आणखी एक संधी दिली आहे.