‘एकदा काय झालं’ मराठी चित्रपटाची या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली निवड
‘एकदा काय झालं’हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अजूनही या सिनेमाची घौडदौड सुरुच आहे. वडील-मुलाच्या नाजूक नात्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न ‘एकदा काय झालं‘ या सिनेमाने केला आहे. या सिनेमात सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे मुख्य भूमिकेत आहे. तर मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
गोष्ट सांगणाऱ्या बाप-लेकाच्या जोडीची एक हळवी गोष्ट ‘एकदा काय झालं’ या सिनेमात मांडण्यात आली आहे. चेन्नई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनारॉमा (Indian Panorama) विभागात या सिनेमाची निवड झाली आहे. अशाप्रकारे या मराठी सिनेमानं आंतरराष्ट्रीय स्वरावर छाप पाडली आहे.
लोकप्रिय संगीतकार, डॉ. सलील कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित या सिनेमाची निवड ‘चेन्नई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’झाली आहे.
‘एकदा काय झालं’ या सिनेमाच्या लेखन, दिग्दर्शन आणि संगीताची धुरा डॉ. सलील कुलकर्णींनी सांभाळली आहे. या सिनेमाला लोकप्रिय गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. 5 ऑगस्टला प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमाच्या माध्यमातून एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न डॉ.सलील कुलकर्णांनी केला आहे.