गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला आणि आज त्यांचे पहिले पुण्यस्मरण.
देशात एकही व्यक्ती नसेल जो देशाच्या या गानकोकिळेला ओळखत नसेल. त्यानिमित्त जगप्रसिद्ध गायिका म्हणून आज त्यांच्या आठवणींना उजाळा देऊयात.
लता मंगेशकर यांचे बालपण
२८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्यप्रदेश मधील इंदोर येथील गायक घराण्यात लता मंगेशकर यांचा जन्म झाला. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक आणि नट दिनानाथ मंगेशकर यांच्या त्या जेष्ठ कन्या. त्यामुळे जन्मापासूनच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. लता दिदींनी शाळेत गेल्यावर शिक्षक त्यांच्यावर नाराज झाल्यामुळे त्यांनी शाळेकडे पाठ फिरवली. अशाप्रकारे त्या केवळ दोनच दिवस शाळेत गेल्या होत्या. घरात संगीताचे वातावरण असल्यामुळे लतादिदींनी लहानपणापासूनच संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली होती.
लता मंगेशकर यांचे खरे नाव
लहानपणी लता दिदीं यांचे नाव ‘हेमा’ असे ठेवण्यात आले होते. परंतु दिनानाथ मंगेशकर यांच्या भावबंध या नाटकातील लतिका या पात्रावरून त्यांनी त्यांचे हेमा हे नाव बदलून लता ठेवले. तसेच मंगेशकर हे देखील त्यांचे मूळ आडनाव नाही, तर हर्डीकर हे त्यांचे मूळ आडनाव होते. सुरुवातीपासूनच गोव्यातील मंगेशी येथे राहत असल्यामुळे त्यांनी मंगेशकर हे आडनाव लावण्यास सुरुवात केली.
गायिका म्हणून कारकीर्द
लता दिदींना घरीच त्यांच्या वडिलांकडून संगीताचे शिक्षण मिळाले होते. लता दिदींनी वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षापासून संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. त्यांनतर वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांसोबत पहिल्यांदा स्टेज सोलापूर येथे परफॉर्मन्स दिला होता. १९४२ मध्ये दिनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. त्यामुळे जेष्ठ कन्या म्हणून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लता दिदींवर येऊन पडली. त्यामुळे त्यांनी सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली आणि खूप कष्टाने त्यांनी यशाचे प्रत्येक शिखर गाठले. लता दिदींनी आपल्या ८० वर्षांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीत वीसहून अधिक भाषांमध्ये तीस हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत.
सिनेसृष्टीतील योगदान
दिनानाथ मंगेशकर यांची इच्छा होती की, त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये काम करू नये. परंतू खूप कष्टाने त्यांना राजी केल्यावर दिदींनी १९४२ मध्ये किती हसाल या चित्रपटासाठी एक गाणे गायले, पण नंतर तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही आणि त्यांचे ते गाणेही. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यामुळे त्यांनी अनेकदा चित्रपटांत छोट्या भूमिकाही साकारल्या. त्यांनी त्यांच्या काळात गायलेलं प्रत्येक गाणं आजही आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात.
पुरस्कार
त्यांच्या कारकिर्दीत फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या नावावर केले आहेत. भारत सरकारकडून लतादिदींना १६६९ मध्ये पद्मभूषण, १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, १९९९ मध्ये पद्मविभूषण, २००१ मध्ये भारतरत्न आणि २००० मध्ये लाइफ टाइम अचिव्हमेंट अवाॅर्ड या मोठ-मोठ्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. आणखी मोलाची भर म्हणजे १९७४ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगात सर्वाधिक गाणी गाण्यासाठी लता दीदींचे नाव कोरले गेले.
निधन
कोविड संक्रमणामुळे ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये वयाच्या ९२व्या वर्षी लता दिदींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर कुटुंबाचा सांभाळ केला. आयुष्यभर स्वतः एकट्या राहिल्या, पण आपल्या स्वभावाने आणि कामाने संपूर्ण जगाला आपलस केलं.
अशा या गानकोकिळेला मानाचा मुजरा.