तुला पाहते रे, हर हर महादेव, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, लोकमान्य, विजेता, बालगंधर्व यांसारख्या अनेक मालिका आणि सिनेमांमधून अभिनेता सुबोध भावे याने प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला आहे. म्हणूनच तो सध्याच्या काळात आघाडीवर असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
सुबोधचा ‘फुलराणी‘ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तो सध्या त्याच्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनच्या निमित्ताने तो अनेक मुलाखती देताना दिसत आहे. यावेळी त्याने सिनेमासोबतच इतर अनेक गोष्टींवर त्याने भाष्य केले.
मागील काही दिवसांपासून मात्र त्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. परंतू त्याने आजवर स्पष्टपणे कोणतीही बाजू मांडली नव्हती. पण सध्या फुलराणीच्या प्रमोशन दरम्यान त्याने होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे. या झालेल्या मुलाखतीत त्याने ट्रोलर्सना चांगलेच खडसावले आहे.
मुलाखतीत सुबोधला विचारण्यात आले की, आपण चांगलं काम केल्यावरही नकारात्मक कमेंट्स करणाऱ्यांना तू काय सांगशील? त्यावर उत्तर देत सुबोध म्हणाला की, “मी त्यांना काहीही सांगायला जाणार नाही. कारण तेवढी त्यांची पात्रता नाही की मी त्यांना काहीतरी सांगावं. आपण रस्त्यावरून जाताना कुत्री भुंकायला लागतात आणि सतत जर ती भुंकायला लागली तर ती डोक्यात जातात. त्यामुळे कधीतरी तुम्हाला तुमच्या हातात दगड घ्यावा लागतो ज्यामुळे ती शांत होतात.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जे माझ्या कामावर टीका करतात त्यांच्यावर माझं प्रेम आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबात राग नाही. पण जे कारण नसताना आपण करत असलेल्या कामामध्ये त्यांची नकारात्मकता घेऊन येतात ती लोकं माझ्या डोक्यात जातात. मी खूप शांत बसायचं ठरवलं होतं पण आता नाही. आता त्यांना ज्या भाषेत समजेल अशाच भाषेत त्यांना उत्तर दिलं जाईल.”
सुबोधनाच्या या उत्तराने ट्रोलर्सना चांगलाच शाब्दिक मार बसला आहे.