संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विनोदवीरांपैकी दोन दमदार विनोदवीर म्हणजे भाऊ कदम आणि ओंकार भोजने. अचूक टायमिंग आणि आपल्या हटके अंदाजातील विनोदबुद्धी या दोन्ही हास्यवीरांना प्रेक्षकांची नाडी सापडली आहे.
कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा भाऊ कदम झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या‘ या कथाबाह्य कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. भूमिका कोणाचीही असो भाऊ त्या भूमिकेला उत्तम न्याय देतो. तसेच भाऊ कदमने काही सिनेमांमधून देखील त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे.
तर दुसरीकडे कोकणचा कोहिनूर म्हणून ओळखला जाणारा विनोदवीर ओंकार भोजने याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केले आहे. तसेच ओंकारने काही दिवसांपूर्वीच ‘सरला एक कोटी’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांनतर आता त्याने व्यवसायिक नाटक विभागात देखील पाऊल टाकले आहे.
View this post on Instagram
भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे दोन्ही जबरदस्त हास्यवीर एकाच नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ते नाटक म्हणजे ‘करून गेलो गांव.’ दहा वर्षांपूर्वी प्रचंड लोकप्रिय झालेले मालवणी भाषेतील या नाटकाची निर्मिती राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे. या नाटकातील बहुचर्चित पात्र म्हणजे भाऊ कदम दहा वर्षांपूर्वी या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून ते आत्तापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
या नाटकामध्ये ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्यासह उषा साटम, नुपूर दूदवडकर, प्रणव जोशी, अनुष्का बोऱ्हाडे, सौरभ गुजले, सचिन शिंदे, सुमित सावंत, दिपक लांजेकर हे कलाकार देखील आहेत. करून गेलो गांव या नाटकाचा शुभारंभ ७ एप्रिल पासून झाला आहे तर रविवार दि.१६ एप्रिल रोजी या नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडणार आहे.