नवीन येणारी प्रत्येक मालिका किंवा सिनेमा हे नवनवीन विषय घेऊन समाज जागृती आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. असाच काहीसा वेगळा विषय घेऊन एक नवी मालिका स्टार प्रवाहवर येत आहे.
‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो चॅनेलवर आणि स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बघायला मिळत आहे. यावरून अभिनेत्री ‘दिव्या पुगावकर’ ही प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. तर या मालिकेचा विषय अगदी भावनिक असून, लग्न झाल्यावर मुलीचा तिच्या माहेरशी असलेला संबंध संपतो का? थेट या प्रश्नावर भाष्य करणारी मालिका आहे.
नवीन मालिका येणार म्हणजे आधीची कोणती मालिका संपणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली पल्लवी म्हणजेच अभिनेत्री ‘पूजा बिरारी’ हिने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
पूजाने स्वतःच फोटो शेअर करत ‘बिईंग पल्लवी’ म्हणत प्रेक्षकांचे आभार मानले. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगदेखील पार पडले आहे. याच मालिकेतून पूजा बिरारी हिला नवी ओळख मिळाली आणि खूपच कमी कालावधीत ती प्रसिद्धीझोतात आली.
स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होत आहे. आता त्याच वेळेत मन धागा धागा जोडते नवा ही मालिका येत्या ८ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा ही मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.