मागील काही दिवसांपासून फक्त सिनेसृष्टीतच नाही तर राजकीय क्षेत्रात देखील प्रचंड चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे ‘द केरळ स्टोरी’. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला. या सिनेमावरुन बरेच वाद झाले आहे. देशभरातील काही राज्यांमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही केली आहे.
सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा केरळमधील ३२ हजार मुलींचे धर्मांतर करून त्यांना दहशतवादी संघटनेत कसे सामील करून घेत आहेत त्यावर आधरित आहे. केरळमधल्या तीन मुलींची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी या तिघींचं आधी ब्रेनवॉश केले जाते. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील करून घेतात.
‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित झाला. हा सिनेमा वादग्रस्त सिनेमांमध्ये मोडत असला तरी सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. परंतू सिनेमाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच त्यांना आणि टीमला एका व्यक्तीकडून असभ्य भाषेत मेसेज येत होते.
याबद्दल सांगताना सुदिप्तो सेन यांनी सांगितले की, “द केरला स्टोरीचा टीझर रिलीज झाल्यापासून मला आणि माझ्या टीमला एका मुलाकडून शिवराळ भाषेत मेसेज पाठवले जात होते. गेल्या दोन महिन्यांपासून तो चित्रपटाच्या सहनिर्मात्याला देखील शिवीगाळ करीत होता.”
हे देखील वाचा : “द केरला स्टोरी ” या चित्रपटामुळे “मराठी पाऊल पडते पुढे” पुर्नप्रदर्शित करणार.
तसेच त्यांनी सांगितले की, “मात्र चित्रपट पाहिल्यानंतर त्या मुलाने मेसेजद्वारे माफी मागितली. एक काळ असा होता की असे लोक चित्रपटाच्या विरोधात उभे होते, मात्र आज चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आमचा विरोध करणे बंद केले आहे. आज ज्या लोकांनी चित्रपट बघितला नाही तेच लोक विरोध करीत आहेत.”
केरळ हायकोर्टाने या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाचे परीक्षण करून त्याला सर्टिफिकेट दिल्याने थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी तो योग्य असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इनानी आणि सोनिया बिहानी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचं सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे.