तेंडल्या हे स्वप्न ज्यांनी पाहिले ते म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक सचिन जाधव. सचिन यांना क्रिकेट फक्त आवडत नव्हते तर त्यांना क्रिकेटचे आणि सचिनचे प्रचंड वेड होते. त्यांचे हे वेड त्यांनी असे जोपासले की ते स्वतः दिग्दर्शक म्हणून नावारूपास आले.
सचिन तेंडुलकर यांना सचिन देवच मानत होते. क्रिकेटमधील सचिन यांचा कार्यकाळ संपण्याची वेळ जवळ आली तेव्हा सचिन यांना वाटले की सचिनने देशाला आणि प्रत्येकाला काही ना काही दिले आहे. त्यामुळे त्याची परतफेड कशी करावी? या प्रश्नातून उलगडलेलं उत्तर म्हणजे तेंडल्या हा सिनेमा.
‘तेंडल्या’च्या स्वप्नपूर्तीचा प्रवास: तेंडल्या या सिनेमाच्या प्रीमियर शोच्या निमित्ताने दिग्दर्शक सचिन जाधव यांनी फिल्लमवालासोबत मनमोकळा संवाद साधला. यादरम्यान त्यांना पुढील प्रश्न विचारण्यात आले.
-
तेंडल्याची सुरुवात कधी पासून झाली ?
”२०१२ पासून मी हा तेंडल्या प्रोजेक्ट करतोय आज जवळपास १० वर्षांनंतर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.” -
तेंडल्याचा उगम कसा झाला?
”खरंतर सचिनने आपल्याला समृध्द करण्यासाठी खूप काही केले आहे. तर आपण त्याची परतफेड कशी करू शकतो. त्याला काय भेट द्याव? पण त्याला क्रिकेटने तर सर्व काही दिलंय. तेव्हा या सिनेमाची जी कल्पना सुचली त्यातून तेंडल्याचा जन्म झाला.” -
सिनेमाचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यास कशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले?
“आम्ही २०२० साली सचिनच्या वाढदिवशी त्याला हा सिनेमा भेट देणार होतो, पण त्या आधीच कोरोना महामारीचा सामना करावा लागला. सिनेमा बनवायला घेतला तेव्हा माहित होतं की आम्ही रिस्क घेतोय पण ही रिस्क कोरोनामुळे आणखीनच वाढली होती. आम्ही घरावर कर्ज काढून, सोने तारण ठेवून आणि शेतीसंबंधित शेती करून पैसे उभे केले. आम्ही कसा बसा पैसा उभा करत राहिलो, तेव्हा जे टेंशन आलेलं तेव्हा देखील सचिन मुळेच आम्हाला प्रेरणा मिळाली.” -
मुंबईमध्ये खेळलं जाणारे क्रिकेट आणि गावाकडील क्रिकेट यातील तुमच्या दृष्टीने काय वेगळेपण आहे?
”मुंबई भागात जे क्रिकेट खेळलं जातं ते आणि गावाकडचे क्रिकेट फार वेगळं असतं. गावाकडे पाऊले, बॅट ठेऊन मोजमाप, स्टंपसाठी काय ठेवायचं तसेच चौकार-षटकार चे अंतर हे ठरवण्यात वेगळीच चढाओढ असते आणि ती खरं तर फार गमतीशीर असते.” -
सुनंदन लेले हे छत्र जेव्हा तुमच्या डोक्यावर आले, जेव्हा ते तुमच्यासाठी आधारस्तंभ बनले तेव्हा तुमच्या काय भावना होत्या?
”आमचं हे काम सचिन यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सुनंदन लेले हे आधार ठरले. त्यांनी आधी पाच ते सहा महिने आमची परिक्षा घेतली. त्यानंतर ते तेंडल्या या टीममध्ये सामील झाले. तेव्हापासून जी त्यांची साथ लाभली ती आजवर. त्यांनी आम्हा सर्वांना खूप मोठा मानसिक आधार दिला आहे.” -
या सिनेमाची दखल जेव्हा स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी घेतली, तेव्हा तुमच्या काय भावना होत्या?
”सचिन सरांची जी पहिली भेट होती ती खूपच अनपेक्षित होती. आम्हाला अचानक मुंबईला बोलावून घेतले होते. आम्हाला एकच चिंता होती की सचिन सर NOC देतील का म्हणून. आम्ही तिथे पोहोचला आम्हाला वाटले येईल कोणी तरी पण तेव्हा साक्षात सचिन सर येऊन आमच्या समोर उभे राहिले. अडीच तासाच्या सिनेमामध्ये मला जवळ जवळ अर्धा तास कसलेच भान नव्हते. आणि खरतर मी सचिनच्या आयुष्यातील पहिला व्यक्ती असेल जो अडीच तासांहून अधिक काळ त्याच्या सहवासात असून त्याच्यासोबत एकही फोटो काढला नसेल.” -
युवा पिढीने या सिनेमातून शिकण्यासारखं खूप काही आहे. मग खास युवकांना तुमचं काय सांगणे असेल?
”सचिन ही एक ऊर्जा आहे आणि त्यांच्याकडून घेण्यासारखे खूप काही आहे. आम्ही ते थोडेफार घेतले अन् त्यातूनच हा सिनेमा तयार झाला. सचिनचे एक वाक्य आहे स्वप्न बघा, स्वप्नांचा पाठलाग करा स्वप्न पूर्ण होतात. याचं उदाहरण म्हणजे मी डिसेंबर २०१२ ल पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालंय. तसेच त्यांची आणखी एक गोष्ट आत्मसात केली ती म्हणजे कितीही काही झालं तरी मैदान सोडायचं नाही आणि मी यावरच विश्वास ठेऊन चालत राहिलो.” -
प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा ?
“आतापर्यंत सचिनचा खेळ सर्वांनी बघितला पण तो माणूस कसा आहे आणि त्याचा स्वप्नपूर्तीचा प्रवास या सिनेमातून तुम्हाला दिसणार आहे.”