‘श्वास’ या चित्रपटातून प्रेक्षकांन समोर आलेली अभिनेत्री अमृता सुभाष हिने तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या खासगी आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा केला आहे. गेली अनेक वर्ष ती नाटक, चित्रपट, मालिका व वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांन समोर येत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून व आपल्या सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत.
ती तिच्या कामा बरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सोशल मिडीयावर सतत चर्चेत असते. ‘वंडर वूमन’ या चित्रपटाच्या निम्मित्ताने तिने ‘आपलं महानगर’ या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखती मध्ये तिच्या सोबत तिचा नवरा संदेश कुलकर्णी देखील होता. या मुलाखतीमध्ये त्यांनी लग्नानंतर मूल न होऊ देण्याचा निर्णय का घेतला या मागची काही कारण सांगितली होती.
या मुलाखती मध्ये अमृता असं म्हणते कि, “आता काळ बदलत चालला आहे. अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मुलं आवडतात पण त्यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यापैकीच एक आम्ही आहोत. मुलं आवडणं आणि ती वाढवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही दोघंही आपापल्या करिअरमध्ये खूप व्यग्र आहोत. त्यामुळे आम्ही बाळाला वेळ देऊ शकू का? आणि त्याला न्याय देऊ शकू का? असा विचार आमच्या मनात आला. त्यामुळेच आम्ही ठरवलं की, आम्हाला बाळ नको.”
पुढे ती म्हणाली “आमच्या कामावर आमचं खूप प्रेम असल्यामुळे ते आम्ही सोडू शकत नाही. तसंच कामावरच्या प्रेमामुळे बाळाकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. आमच्यासारखा विचार करणारे अनेक जण आहेत. परंतु आम्हाला मुलं आवडत नाहीत असा याचा अर्थ होत नाही. आमच्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांवर मी खूप प्रेम करते. मी माझी कामं करून मला वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी खेळायला जाऊ शकते. मी करिअरकडे ज्या पद्धतीने पाहते त्यात बाळाचं संगोपन मला करता आलं असतं का, असा प्रश्न मला पडतो.”
या मुलाखतीच्या शेवटी ती असं देखील म्हणाली होती. “आता अनेक जण बदलत्या काळानुसार हा विचार करू लागले आहेत. काळानुसार पूर्णत्वाची व्याख्याही बदलली आहे. त्यामुळे एक बाई तिच्या कामामुळे पूर्ण असू शकते किंवा तिच्या असण्याने ती पूर्ण असू शकते. त्याच्यासाठी तिचं लग्न झालं म्हणजे तिचं योग्य झालं, तिला मूल झालं म्हणजे तिचं योग्य झालं, तिचं करिअर झालं म्हणजे तिचं योग्य झालं असं आता राहिलेलं नाही,”