‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी उत्साहाने ही मालिका बघत असतात. या मालिकेची सुरुवात २००९ ला झाली असून खूप कमी वेळात अतिशय लोकप्रिय झालेली ही मालिका आहे. यामधले कलाकार देखील खूप उत्साही आहेत. पण सध्या असे दिसून येते की या मालिकेचे ग्रह फिरले असून ही मालिका आत्ता चांगलीच गोत्यात आली आहे. मालिकेच्या निर्मात्यावर केलेले आरोप दिवसेंदिवस वाढत आहेत. मालिकेच्या सेट वरील वातावरण अतिशय वाईट असल्याचे बोलले जात आहे.
मालिकेमध्ये रोशन भाभीचं पात्र साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने काही दिवसांपूर्वीच मालिकेच्या निर्मात्यावर म्हणजेच असित मोदीवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यानंतर त्याच मालिकेमध्ये रिटा रिपोर्टर ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजा हिने देखील निर्मात्यावर आरोप केले आहेत. निर्मात्याच्या कठोर नियमांमुळे मालिकेतील कलाकार त्रासले आहेत.
प्रिया म्हणाली की, माझ्याशी कुणी वाईट वागलं नाही किंवा माझा छळ केला नाही. पण तिथे अशा काही गोष्टी होत्या की ज्या सहन करण्यापलीकडच्या होत्या.
मालिकेतून बाहेर पडलेल्या एका कलाकारानं सांगितलं की, दिशा वकानी बाहेर पडल्यानंतर मालिकेला मोठा फटका बसला. कार्यक्रमाच्या सेटवर दबावाचं वातावरण होतं. अशा तणावपूर्ण वातावरणात चांगलं काम करण्याची अपेक्षा केली जात होती. त्यामुळे हा तणाव अधिकच वाढला होता. सेटवर कायम राजकारण केलं जायचं.
कार्यक्रमाचे आधीचे दिग्दर्शक मालव राजदा हे देखील कार्यक्रमातून बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी सांगितलं की ते जे काही काम करत होते, त्यातून त्यांना समाधान मिळत नव्हतं. मात्र प्रत्यक्षात त्यांचंही निर्मात्यांशी जमत नव्हतं. दिग्दर्शक म्हणून त्यांना निर्मात्यांशी बोलताच येत नव्हतं. म्हणून तेही या मालिकेतून बाहेर पडले.
तसेच तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांना देखील मालिकेशिवाय इतर कामे करण्यास निर्मात्याने बंदी घातली होती.