सध्या मराठी सिनेसृष्टीत एकच विषय चर्चेत आहे. तो विषय कोणत्याही सिनेमाचा, नाटकाचा, मालिकेचा नसून मराठी सिनेसृष्टीत कलाकारांना होणाऱ्या विनाकारण ट्रोलिंगचा आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याचा मुलगा ‘जहांगीर’ याच्या नावावरून चिन्मयच्या महाराजांच्या भूमिकांशी संबंध जोडला जात आहे.
चिन्मयला आणि त्याच्या कुटुंबियांना या ट्रोलिंग इतका त्रास होत आहे की, चिन्मयने थेट टोकाची भूमिका घेतली आहे. चिन्मयने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट शेअर करत त्याने घेतलेला मोठा निर्णय त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला. “छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत या भूमिकेची मी रजा घेतो.” असं म्हणत या व्हिडीओमध्ये त्याने हे घोषित केले की, तो यापुढे कधीचं मालिका अथवा सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही. त्याने ही गोष्ट सर्वांसोबत शेअर करताच सर्वांनाच याचा धक्काच बसला. तर अनेकांनी त्याला पाठिंबा देत हा कठोर निर्णय मागे घेण्याची विनंती देखील केली. एवढंच नाही तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करत, स्टोरी टाकत चिन्मयला सपोर्ट केला आहे.
View this post on Instagram
पण चिन्मय आता निर्णय मागे घेणार का? की हाच नियम कायम स्वरूपी लागू राहणार याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. परंतू त्याच्या ऐवजी नवा चेहरा महाराजांच्या भूमिकेसाठी पाहणे हे खूपच निराशाजनक आहे. कारण, महाराजांची भूमिका म्हणजेच चिन्मय मांडलेकर साकारणार हे जणू एखादं समीकरणचं झालं आहे. तसेच लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक या शिव पराक्रमावरील सिनेमाच्या मालिकेतील सर्वच सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकरनेच महाराजांची भूमिका साकारली आहे. तर या अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ आणि ‘सुभेदार’ हे सिनेमे जरी प्रदर्शित झाले असले तरी काही सिनेमे बाकी आहेत. तर आता बाकी सिनेमात चिन्मय दिसणार की नाही हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
तर आता या विषयावर दिग्पाल लांजेकर यांनी देखील भाष्य केले आहे. तेव्हा ते म्हणाले की, “चिन्मयशी या विषयावर माझी अद्याप सविस्तर चर्चा झालेली नाही. आमचं जुजबी मेसेजच्या रुपात बोलणं झालं. पण, त्याने हा निर्णय घेण्याआधी आमची चर्चा झालेली नाही. आज चर्चा होईल असं अपेक्षित आहे. शिवराज अष्टक मालिकेत महाराजांची भूमिका अजूनतरी चिन्मयच करणार आहे. पण, आमची चर्चा झाल्यावर अंतिम जे काही आहे ते कळेल.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “सध्या मी काहीही बोलायला समर्थ नाही कारण, अनेक गोष्टींची मला कल्पना नाही. या सगळ्या गोष्टींवर शिवराज अष्टक अवलंबून आहे. कारण, शिवराज अष्टक मालिका केवळ सिनेमाचा भाग नसून तो लोकांच्या भावनेचा भाग आहे. प्रत्येकाला त्यात सहभागी व्हावं लागेल. चर्चा झाल्याशिवाय सध्या यावर मी काहीही बोलणं चुकीचं ठरेल.”
त्यामुळे आता दिग्पाल लांजेकर चिन्मय मांडलेकरचा निर्णय बदलतील का, याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.