मालिका असो वा सिनेमा आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपली निराळी छाप पाडली आहे. श्रेयसचे गाजलेले सिनेमे अन् त्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की, तेव्हापासून श्रेयसला पडद्यावर काम करताना पाहण्यासाठी त्याचे चाहते कायमच उत्सुक असतात.
काही दिवसांपूर्वीच श्रेयसचे चाहते खुश झाले, त्याचे कारण म्हणजेच नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा नवा-कोरा सिनेमा. हा सिनेमा म्हणजे ‘ही अनोखी गाठ’, हा सिनेमा १ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात श्रेयस मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री गौरी इंगवले हिने देखील मुख्य भूमिका साकारली आहे. कुटुंबीयांमुळे या दोघांची ही अनोखी गाठ कशी बांधली जाते हे दाखवणारा हा सिनेमा. सिनेमा प्रदर्शित होऊन आठवडाच पूर्ण पूर्ण झाला असून त्यातच श्रेयसने आगामी सिनेमाची घोषणा देखील केली.
View this post on Instagram
श्रेयसच्या आगामी सिनेमाचे नाव ‘लव्ह यू शंकर’ असे असून आज खास महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या सिनेमाची घोषणा झाली आहे. स्वतः श्रेयसने पोस्ट शेअर करत या आगामी सिनेमाची खबर त्याने त्याच्या चाहत्यांना दिली. सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करत श्रेयसने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ही अनोखी गाठला सलग दुसऱ्या आठवड्यात तुमच्याकडून प्रेम मिळत असताना…महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी माझ्या पुढची घोषणा करत आहे – लव्ह यू शंकर. ज्याप्रमाणे तुम्ही ही अनोखी गाठला अपार प्रेम दिले आहे आणि करत राहा, मला आशा आहे की तुम्ही देखील याचा आनंद घ्याल. हर हर महादेव. प्रेम, भावना आणि साहसाची ही कहाणी तुमच्या मनाला गुंजवेल. लव्ह यू शंकर सिनेमा १९ एप्रिल हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नडमध्ये रिलीज होणार आहे.”
लव्ह यू शंकर यावरून आपसूक समजते की हा सिनेमा शंकर भगवान यांच्या संबंधित आहे. त्यामुळेच महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर लव्ह यू शंकर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित करण्यात आली. त्यानुसार श्रेयसचा हा सिनेमा येत्या १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा मुळचा हिंदी भाषेतील असून तमिळ, तेलुगू आणि कन्नडमध्ये देखील हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
मुख्य भूमिकेत असलेल्या श्रेयस आणि गौरी यांच्या व्यतिरिक्त तनिषा मुखर्जी, अभिमन्यू सिंग, हेमंत पांडे हे कलाकार देखील या सिनेमात झळकले आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजीव एस. रुईया यांच्याकडे असून तेजस देसाई आणि सुनीत देसाई यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
हे देखील वाचा : बाईचं मन ओळखल्यानंतर केदार शिंदे यांनी धरला आईचा पदर….