ओळख, लोकप्रियता, प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळवून देणारं क्षेत्र म्हणजे सिनेसृष्टी. सिनेसृष्टीत काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यामुळे त्या स्वप्नाचा पाठलाग करताना स्वप्नपूर्तीचा ध्यास घेतलेला प्रत्येक नवोदित कलाकार कोणत्याही पाठिंब्याशिवाय या क्षेत्रात उतरतो. पण या क्षेत्रात आल्यावर खासकरून नवोदित कलाकारांना अनेक लहामोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांपैकी सऱ्हास प्रत्येकासमोर येऊन ठेपणारी समस्या म्हणजे कास्टिंग काऊच.
बऱ्याचदा अनेक नवोदित कलाकार कास्टिंग काऊच सारख्या धक्कादायक प्रकाराला बळी पडतात. त्यातून काही आपलं रक्षण देखील करतात अन् शिवाय अनेकजण यावर उघडपणे बोलून त्यांचं मत आणि त्यांचा तो भयावह अनुभव सांगतात. अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीला देखील कास्टिंग काऊचच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. तर ती अभिनेत्री म्हणजे ‘रुतुजा सावंत.’ ‘पिशाच्नी’ या मालिकेत आपण रुतुजाला प्रमुख भूमिका साकारताना पाहिले आहे. तसेच ती ‘मेहंदी है रचनेवाली’ आणि ‘छोटी सरदारनी’ यामध्ये देखील झळकली आहे.
सिनेसृष्टीत उतरल्यावर करिअरच्या सुरुवातीलाच रुतुजाला कास्टिंग काऊचचा अनुभव आला. तेव्हा रुतुजा अवघी २० वर्षांची होती. २० व्या वर्षी आलेल्या कास्टिंग काऊचच्या प्रसंगी तिने स्वतःची कशी सुटका केली, तसेच त्या ठिकाणाहून ती कशी निसटली यांसारख्या अनेक गोष्टी हा संपूर्ण प्रसंग तिने एबीपी न्यूजच्या मुलाखतीत सांगितला.
हा प्रसंग सांगताना रुतुजा म्हणाली की, “संघर्ष करणाऱ्या कलाकारासाठी ऑडिशन देणं खूप सामान्य गोष्ट आहे. काम मिळवण्यासाठी खूप ऑडिशन्स द्याव्या लागतात. मी २० वर्षांचे होतो तेव्हा कामाच्या शोधात होते. एके दिवशी मला एका एजंटचा फोन आला आणि त्याने मला त्याच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बोलावलं. मी त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यावर मला कामाबद्दल सांगण्याऐवजी तो माझ्या जवळ येऊ लागला. त्याने मला जोरात त्याच्याकडे ओढलं. यामुळे मी खूप घाबरले आणि कशीतरी तिथून पळून गेले.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “या घटनेतून मला शिकायला मिळालं की अनोळखी लोकांना भेटताना खूप सावध राहा, काळजी घ्या. मी त्या दिवसापासून एकटी कोणत्याही मीटिंगला गेलेली नाही. मी नेहमी माझ्या मित्र किंवा मैत्रिणीला बरोबर न्यायचे. आजही मी जेव्हा कधी कामानिमित्त कोणाला भेटायला जाते तेव्हा ती व्यक्ती कोण आहे, याबाबत जाणून घेते.”
कास्टिंग काऊचच्या वाढत्या समस्येवर बोलताना रुतुजा म्हणाली की, “नवीन कलाकारांना अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं हे खूप दुर्दैवी आहे. पण जगात चांगले आणि वाईट दोन्ही लोक राहतात. आपण फक्त स्वत: ला सुरक्षित ठेवलं पाहिजे.”
त्यामुळे कोणत्याही कलाकाराचा आणि खासकरून नवोदित कलाकाराचा प्रवास साधा नसतो.