आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायची इच्छा प्रत्येक चाहात्याला असते. मग त्या कलाकारांचे पडद्यापेक्षा पडद्यामागचे आयुष्य नक्की कसे आहे याचा ते शोध घेत असतात. भारतातील सर्वोत्कृष्ट गायक ‘उदित नारायण’ यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी.
उदित नारायण यांचा जन्म बिहारच्या एका मैथिली ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. जेव्हा उदित नारायण हे ८ ते १० वर्षाचे होते, तेव्हा ते रेडियो ऐकायचे. गायक होण्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. त्यांच्या काळात त्यांनी १०० रु. महिना अशी नोकरी ही केली. उदित नारायण यांच्या वडिलांना वाटायचं की उदित यांनी गाणं सोडू नये पण शिक्षण घेऊन इंजिनिअर व्हावं आणि पैसे कमवावेत. मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, महेंद्र कपूर हे सगळे रेडिओत बसून गातात असं त्यांना वाटायचं. १०० रुपये पुरायचे नाहीत, त्यामुळे मग त्यांनी हॉटेलमध्ये गाणं म्हणण्यास सुरुवात केली. म्युझिकल स्कॉलरशिप मिळाल्यानंतर ते मुंबईत आले.
उदित नारायण हे एका मुलाखतीत म्हणाले होते की, “गाता गळा लाभणं हे दैवी देणगी असते असं मला वाटतं. मी देवाचे आभार मानतो की त्याने मला गाता गळा घेऊन पाठवलं. आपल्या आवाजात वेगळेपण असतं, आपण गातो त्यामागे मेहनत असते. माझ्या पिढीतल्या जवळपास प्रत्येकाला मी आवाज दिला आहे. मी कायम हा प्रयत्न करतो की जो कलाकार समोर आहे त्याप्रमाणे गाणं म्हणावं. आपल्या डोक्यात, मनात सकारात्मक विचार केला की आपल्याला गोष्टी सहज शक्य होतात. दिग्दर्शक, निर्माते मला सांगतात सिनेमात कलाकार कोण आहे, गाणं कसं आहे? हे सांगतात. मी दिग्दर्शक जे सांगतात ते लक्षपूर्वक ऐकतो. तसंच जे संगीतकार ज्या पद्धतीने सांगतात त्याप्रमाणे आम्ही गातो. कलाकार कोण आहे याचा विचार करावा लागतो. शब्दांचं सौंदर्य कसं आहे, दिग्दर्शकाला काय हवं आहे? अशा सगळ्याच गोष्टी विचारात घेऊन आम्ही गातो. ज्या कलाकारासाठी आम्ही गाणं म्हणतो त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. शाहरुख खान गाणं म्हणत असेल तर त्याची स्टाईल कशी आहे ते लक्षात घेत असतो. त्याप्रमाणे गाणं सोपं होतं.”
“माणूस जेव्हा कलाकार म्हणून यशस्वी होतो तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा वाढतात. मी जेव्हा लोकांकडून माझी स्तुती ऐकतो माझं गाणं त्यांना आवडतं तेव्हा माझ्यावरची जबाबदारी जास्त वाढली असं मला वाटतं. त्यामुळे मी रोज चांगलं गाणं कसं म्हणेन यासाठीच मेहनत घेतो. तुम्ही जे काही काम करत आहात त्यात नियतीचा, नशिबाचा भाग पाच ते दहा टक्के असतो पण ९० टक्के आपलं प्रयत्न असतात ते सोडायचे नसतात. आपण प्रयत्न केले की यश मिळतं.” असे उदित नारायण म्हणाले.
उदित नारायण यांनी एका मुलाखतीत लता मंगेशकर यांच्या भेटीदरम्यानचा किस्सा सांगितला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, “लता मंगेशकर यांच्याशी पहिली भेट पुण्यात झाली होती. त्यानंतर बंगळुरु या ठिकाणी त्यांच्याशी पुन्हा एका कार्यक्रमात भेट झाली. तो दिवस मी कधीही विसरणार नाही. कारण त्या दिवशी माझा वाढदिवस म्हणजेच १ डिसेंबर होता. लता मंगेशकर यांना जेव्हा समजलं की माझा वाढदिवस आहे तेव्हा त्यांनी मला सोन्याची एक चैन भेट म्हणून दिली. त्यानंतर माझं नाव त्यांनी ‘प्रिन्स ऑफ प्ले बॅक सिंगर’ असं ठेवलं. लता मंगेशकरांकडून मला ती खास भेट मिळाली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. माझ्यासाठी तो आशीर्वादच ठरला ती चैन मी आजही सांभाळून ठेवली आहे.”
“लता मंगेशकर यांच्यासह मी २०० हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्यासह गाणं म्हणायला मिळणं ही मी भाग्याची गोष्ट समजतो. एखाद्या लहान भावाप्रमाणे त्या माझ्यावर माया करत. एवढंच नाही ज्या काळात मी काम मिळवण्यासाठी धडपड करायचो तेव्हा दुरुन काही वेळा लता मंगेशकर यांना पाहिलं होतं. त्यांच्या बरोबर उभं राहून गाता आलं हे मी माझं भाग्य समजतो. ‘वीर झारा’ सिनेमासाठी जेव्हा आम्ही ‘जानम देख लो मिट गयीं दूरियां’ हे गाणं म्हटलं तेव्हा लतादीदींचा फोन आला होता. त्या म्हणाल्या मी तुमच्या घरी येते. मला आधी वाटलं की दीदी बहुदा माझी फिरकी घेत आहेत. मात्र पुढच्या १५ मिनिटात त्या आल्या आणि माझ्या घरी त्या चार तास थांबल्या होत्या. त्यावेळी मला वाटलं की देवी सरस्वतीच माझ्या घरी आली आहे.” असेही उदित नारायण म्हणाले.
उदित नारायण यांच्या आवाजाची जादू आजही तरुणाईला भावते. उदित नारायण यांनी अमीर खान सलमान खान, शाहरुख खान, सनी देओल, गोविंदा यांच्यासह अनेकांसाठी पार्श्वगायन केलं आहे. आजवर एकाहून एक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत.