कलाविश्वात काम करायचं म्हंटल, की स्ट्रगल हा आलाच. आपल्याला कोणत्याही क्षेत्रात काम करायचं असेल तर स्ट्रगल करावाच लागतो. सिनेमा आणि मालिकांमध्ये असं कित्येकदा झालं आहे, की रातोरात एखाद्या कलाकाराला बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. यावर अनेकजण उघडपणे बोलना दिसून येतात. पण असे देखील काही कलाकार आहेत, जे या सगळ्यावर बोलण टाळतात. अशीच एक मराठी अभिनेत्री आहे, जिला एका मालिकेतून एका रात्रीत बाहेर काढले होते. आणि ती अभिनेत्री म्हणजे अक्षया गुरव. अक्षयाने आतापर्यंत अनेक मालिका, सिनेमे आणि वेबसिरीजमध्ये कामे केली आहेत. राधा प्रेम रंगे रंगली, लव्ह लग्न लोच्चा, मानसीचा चित्रकार तो या मालिकांमध्ये तिने उत्तम काम केले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘श्यामची आई’ या सिनेमात ती झळकली होती.
नुकतच एका मुलाखती दरम्यान अक्षयाने तिला इंडस्ट्रीमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले. तिला एका मालिकेतून काढून टाकले होते. यावेळी तिला मध्यंतरीच्या काळात तू इंडस्ट्रीपासून दूर का होतीस? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ती म्हणाली, “हो…मी सलग चित्रपट केले नाहीत. पण, आजवर जी कामं केली आहेत ती सगळी उत्तमप्रकारे करून काहीशा वेगळ्या धाटणीच्या भूमिका मी निवडल्या होत्या. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक संघर्षाचा किंवा वाईट काळ येतो. तसाच माझ्याही आयुष्यात आला होता, तेव्हाच माणूस स्वत:च्या पायावर उभा राहायला शिकतो. गेल्यावर्षी माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि आम्ही दोघंही एकाच इंडस्ट्रीत काम करतो. ऑपरेशन झाल्याने तो जवळपास ५ ते ६ महिने घरी होता आणि त्या काळात माझ्याकडे काही कामच नव्हतं. तो काळ माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता. मी काही लोकांना सांगितलं होतं की, ‘प्लीज काम द्या’ त्या दिवसांमध्ये मी कोणतीही भूमिका करण्यासाठी तयार होते. कारण, प्रत्येक कलाकारासाठी काम खूप महत्त्वाचं असतं. त्या मधल्या काळात मला एका शोसाठी ऑफर आली होती. मोठं चॅनेल आहे त्यामुळे मी नाव घेणार नाही. त्यांनी मला फायनल केलं, लूक टेस्ट, मॉक शो झाले, संपूर्ण प्रक्रिया पार पडली आणि अचानक आदल्या रात्री मला फोन करून सांगितलं तुझ्याबरोबर आम्ही काम करणार नाही. आम्ही त्या पात्रासाठी दुसरी अभिनेत्री कास्ट केली आहे.”
पुढे ती म्हणाली, “मला त्या प्रसंगानंतर खरंच खूप जास्त वाईट वाटलं होतं. कारण, कमिटमेंट केली जाते, अग्रीमेंट साइन केलं, त्या मालिकेसाठी मी एक हिंदी वेबसीरिज सोडली होती. त्यात माझ्या घरी कठीण काळ सुरू होता. मी खरंच तेव्हा खूप जास्त खचले. मी रडले नाही…पण, माझ्या मनाला ती गोष्ट प्रचंड लागली. कदाचित ते पात्र माझ्यासाठी नव्हतं आणि तो शो आता बंद होतोय. ज्या शोसाठी मला विचारलं, पुढे जाऊन काढलं, दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केलं त्याबद्दल यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाहीये. आज पहिल्यांदाच मी याबद्दल एवढं सगळं बोलले आहे.”
काही महिन्यांपूर्वी अक्षया स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दिसून आली होती. तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.