मराठी असो वा हिंदी, सध्या सिनेसृष्टीत रिअॅलिटी शोची चांगलीच लोकप्रियता वाढली आहे. त्यात मराठी रसिक प्रेक्षकांमधील सर्वांचा आवडता रिअॅलिटी शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. मागील काही वर्षांपासून सुरु असलेल्या या शोने असंख्य प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तर या शोमधून अनेक नवोदित कलाकार महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सर्वांचा लाडका गौरव मोरे (Gaurav More).
गौरवने महाराष्ट्राची हास्यजत्रामधून आपल्या अभिनयाने, विनोदबुद्धीने आणि अचूक टायमिंगने तमाम प्रेक्षकांचे मन जिंकले. तर याच शोमधून गौरव खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आला. या शोमुळे गौरवला प्रसिद्धीसह एक नाव मिळालं ते म्हणजे ‘फिल्टरपाड्याचा बच्चन.’ प्रसिद्धीमुळे त्याच्या करिअरला देखील कलाटणी मिळाली. त्यामुळे सध्या गौरवचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. इतकंच नाही तर अनेक कलाकारांना देखील त्याच्या अभिनयाची भुरळ पडते. गौरव अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर मुलाखती देताना दिसतो. त्याने नुकतीच एक मुलाखत दिली, यावेळी अनेक बारीकसारीक विषयांवर तो मनमोकळेपणाने व्यक्त झाला.
तसेच त्याच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस आणि आर्थिक परिस्थितीवर तो दिलखुलास बोलला. अभिनय आणि त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांबद्दल बोलताना गौरव म्हणाला की, “माझी टिपिकल ऑनस्क्रीन हिरोसारखी पर्सनॅलिटी नाही. पण सिनेमा आणि कॉमेडीसाठीचं माझं प्रेम ओळखून मी हिरोच्या भूमिकेत काम न करताही वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न केला.”
सिनेसृष्टीतील करिअरला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा गौरवला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या परिस्थितीची आठवण करून देताना तो म्हणाला की, “मी १०० रुपयांत सर्व खर्च भागवायचो. प्रवास किंवा ऑडिशन्सला जाण्यासाठीचा खर्च मला परवडायचा नाही. मला सुरुवातीला फोनसुद्धा माहीत नव्हता. बऱ्याच काळानंतर मी की-पॅडवाला फोन खरेदी केला होता.
यावेळी गौरवने त्याच्या मुंबईमधील काही आठवणी सांगितल्या. तेव्हा तो म्हणाला की, “मुंबईतल्या पवई फिल्टरपाडा या झोपडपट्टीत मी लहानाचा मोठा झालो. वस्तूंचं मूल्य काय असतं, हे मला तिथे राहून योग्यरित्या समजलं होतं. आता तिथल्या लोकांना माझ्यामुळे एक ओळख मिळाल्याचं ते सांगतात. अशा ठिकाणी मी वाढलो, याचा मला अभिमान आहे. कधीकधी प्रसिद्धी तुम्हाला तुमचं मूळ विसरायला लावते. पण मी ते कधीच विसरणार नाही. मी कितीही मोठा स्टार झालो तरी मी कुठे जन्माला आलो आणि लहानाचा मोठा झालो, हे कधीच विसरणार नाही.”
अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असताना गौरवला सुरुवातील त्याच्या कुटुंबीयांकडून साथ मिळाली नव्हती. हा अनुभव सांगताना तो म्हणाला की, “या क्षेत्रात काम करण्यासाठी संयम लागतो. इथे रातोरात तुम्हाला पैसा कमावता येत नाही. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांनी माझी साथ दिली नव्हती. पण त्यांच्या स्थानी ते बरोबर होते. आपल्या मुलाने चांगला पैसा कमवावा, असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. माझ्या संघर्षाच्या दिवसात मी एक रुपयाही कमावत नव्हतो. तरीही माझ्या आईवडिलांनी मला ते सर्व दिलं, जे त्यांना शक्य होतं. पण आमची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती, म्हणून सर्वसामान्य गरजांपेक्षा वेगळं काही मी त्यांच्याकडे मागू शकलो नाही.”
शेवटी त्याला ओळख मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोबद्दल बोलताना म्हणाला की, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने मला सर्वकाही दिलं. पैसा, प्रसिद्धी आणि स्थैर्य या गोष्टी मला शोने दिल्या. सध्या मी सर्वांत महागड्या फोनपैकी एक फोन वापरतो. दहा वर्षांपूर्वी बस किंवा ट्रेनने प्रवास करण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. आता माझ्याकडे कार आणि बाईक आहे. त्यावेळी माझ्याकडे शूज नव्हते. पण आता शूजचं कलेक्शन आहे. माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे काही मित्रांनी माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. पण आता तेच माझ्या घरी येतात आणि माझ्यासोबत सेल्फी किंवा फोटो क्लिक करतात.”
गौरवचा अभिनय आणि विनोदासोबत त्याची केशभूषा आणि स्टाईलचे देखील अनेकजण दिवाणे आहेत.