मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’ (Amruta Khanvilkar). अमृताने आपल्या कलेने, कौशल्याने प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
मराठी सिनेमा असो वा इतर कोणतेही माध्यम अमृताने उत्तम अभिनयाच्या जोरावर मराठी कलाविश्वातच नाही तर संपुर्ण भारतीय सिनेसृष्टीत नावलौकिक मिळविले. फक्त अभिनयच नाही तर नृत्यामध्ये पारंगत होत, ती प्रेक्षकांच्या हृदयातील लावणी सम्राज्ञी बनली. अमृताचा अभिनय आणि नृत्य या दोन गोष्टींचा सुंदर मेळ पाहायला मिळालेला चंद्रमुखी या सिनेमापासून तिला चंद्रा ही नवी ओळख मिळाली. त्यामुळे दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेत कमालीची भर पडत आहे.
लोकप्रियता वाढली की चांगल्या वाईट अशा अनेक चर्चा सुरू असतात. अमृता सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. आजच्या ट्रेंडिंग आणि मॉर्डन गोष्टींसोबतच अमृता प्रत्येकवेळी आपली संस्कृती आणि परंपरा जपते. ती अनेकदा तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिच्या कामाच्या देखील अनेक गोष्टी चाहत्यांसोबात शेअर करते. परंतू अमृता, पती म्हणजेच हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता हिमांशू मल्होत्रा सोबतचे फोटो क्वचितदा पोस्ट करते. बहुतांश वेळा ती हिमंशुसोबतचे फोटो पोस्ट करणं टाळते. त्यामुळे पतीसोबत फोटो का पोस्ट करत नाही यावरून अमृताला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. परंतु यामागे नक्की काय कारण आहे हे आता स्वतः अमृताने स्पष्टपणे सांगितले आहे.
अमृताने नुकतीच झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ट्रोलिंगक्या या विषयाबद्दल सांगितले तेव्हा ती म्हणाली की, “मला असं वाटतं की आमचे चाहते हे आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. काही लोकांना तुम्ही आवडता आणि काही लोकांना नाही. जोपर्यंत ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा-ढवळ करत नाही तोपर्यंत सगळं काही ठीक आहे. ते माझ्या कामाबद्दल आणि मी इन्स्टाग्रामवर जे शेअर करते त्याविषयी बोलतात, तो पर्यंत सगळं ठीक आहे. पण ते जेव्हा मला, माझ्या कुटुंबाला किंवा मला आणि हिमांशुला ट्रोल करणं सुरु करतात, तेव्हा मात्र मला ते आवडत नाही. मी त्याच्याबद्दल काही पोस्ट करत नाही, कारण मला त्याला या सगळ्यापासून लांब ठेवायचं आहे. माझ्यासाठी त्याच्याविषयी सगळं काही शेअर करण्यापेक्षा त्यांचा बचाव करणं खूप महत्त्वाचं आहे, त्याचं कारण म्हणजे तो या इंडस्ट्रीतून नाही.”
तसेच अमृता पुढे म्हणाली की, “कोणत्या प्रकारे होणाऱ्या ट्रोलिंगला आणि द्वेषासाठी तो पात्र नाही, कारण या सगळ्यामुळे त्याला दु:ख होऊ शकतं. मी नेहमीच याची काळजी घेतली, घेते आणि घेत राहीन. मी हिमांशू आणि माझे जास्त फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही त्यामुळे मला ट्रोल करण्यात आलं. पण मी माझ्या आई-वडिलांकडे पाहते, जे गेल्या ४५ वर्षांपासून आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत, त्या दोघांचे फेसबूक किंवा इन्स्टाग्रामवर एकही फोटो नाही. मला तेच करायचं आहे. मी जुन्या विचारसरणीची आहे. मी आणि हिमांशू एकमेकांना तेव्हा पासून ओळखतो, जेव्हा इन्स्टाग्राम नव्हतंच. २००४ पासून एकमेकांना आम्ही ओळखतोय, तेव्हा आम्ही कॅमेऱ्यात फोटो काढायचो. आम्हाला एकमेकांना सुरक्षित ठेवायचं आहे आणि एकमेकांची ओळख जपायची आहे.”
तर दुसरीकडे अमृता आता पुन्हा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.