सिनेसृष्टीत सध्या वेबसिरीजची चांगलीच हवा सुरू आहे. त्यात आता बॉलिवूड सिनेमांमध्ये गाजलेलं नाव म्हणजे ‘संजय लीला भन्साळी’ (Sanjay Leela Bhansali). ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ (Heeramandi: The Diamond Bazaar) या सिरीजमधून त्यांनी ओटीटीवर पदार्पण केले.
१४ वर्षे या सिरीजवर काम केल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी ही सिरीज प्रदर्शित केली आहे. या सिरीजचा पहिला सीझन १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. रेड लाईट एरियाची गोष्ट सांगणाऱ्या सिरीजचं सर्वांकडून कौतुक होत आहे. या सिरीजमध्ये प्रेम, फसवणूक, आणि राजकारण सर्वच गोष्टी पाहायला मिळाल्या. सिनेसृष्टीतील कलाकार देखील या सिरीजचे भरभरून कौतुक करत आहेत. या सिरीजला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच केवळ भारतातूनच नाही तर पाकिस्तान मधून देखील कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याचा खुलासा स्वतः संजय लीला भन्साळी यांनी केला. इंडीवायरला दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भन्साळी म्हणाले की, “मला पाकिस्तानकडून खूप प्रेम मिळाले. लोक या वेबसीरिजची आतुरतेने वाट पहात होते. जेव्हा संपूर्ण भारत एक होता तेव्हा तो अविभाजित होता, तसेच यांना जोडणारी ही वेब सीरिज एक दुवा आहे जी आपल्या सर्वांना एकत्र आणते. ही लोकं आपली आहेत. ही लोकं दोन्ही देशांची आहेत आणि या वेब सीरिजबद्दल दोन्ही देश खूप प्रेम दाखवत आहेत.”
तसेच संजय लीला भन्साळी पुढे म्हणाले, “मला अजूनही असं वाटतं की आपण सर्व एक आहोत, आपण सर्व अनेक गोष्टींमुळे एकमेकांशी जोडलेले आहोत. यावरूनही काही जणांना समस्या निर्माण करायच्या आहेत, त्यांचा विचार सोडून दिला तर मला दोन्ही बाजूंनी प्रेम मिळतंय. प्रेक्षक आणि निर्मात्यामधील देवाण-घेवाणीचा हा एक भाग आहे.”
तर सिरीजमधील पात्रांबद्दल बोलताना ते म्हणाले की, “माझ्या या वेबसीरिजमध्ये अशी काही पात्र आहेत, जी लोकांना जोडणारी आहेत. म्हणूनच ते या पात्रांबद्दल बोलत आहेत. खूप जणांना ती पात्र आवडली आहेत, खूप जणांना ती पात्र नाही आवडली. जेव्हा त्यांच्याकडून मला प्रेम मिळतं तेव्हा ते स्वीकारायला मला नेहमीच आवडतं आणि जेव्हा ते माझ्या कामाशी जोडले जात नाहीत तेव्हा त्यांनी केलेली टीकाही मला चालते.”
तर हिरामंडी या बहुचर्चित वेबसिरीजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख, फरदीन खान यांसारखे अनेक तगडे कलाकार आहेत.