मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये देखील कमालीची लोकप्रियता मिळवलेलं कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया (Riteish Deshmukh and Genelia). रितेश आणि जेनेलिया या दोघांनी स्वतंत्रपणे आपल्या कामाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.
कामाव्यतिरिक्त ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि सोशल मीडियावरील त्यांच्या अफलातून पोस्ट्समुळे त्या दोघांचीही कायम चर्चा असते. आता सध्या देशभरात निवडणुकांचं वातावरण आहे. अन् रितेश आणि जेनेलिया यांचा राजकारणाशी खूप जवळचा संबंध आहे. त्याचे कारण म्हणजे रितेशचे वडील हे महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री. त्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तसेच रितेशचे दोन भाऊ सुद्धा राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे आता मतदान प्रक्रिया सुरु असताना दोघांनी जोडीने थेट गावाचा रस्ता धरला आहे. लातूर हे रितेशचं मूळ गाव, त्यामुळे ते दोघेही खास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लातूरला गेले आहेत.
लातूरला गेल्यावर रितेश आणि जेनेलिया यांनी बाभळगाव मतदान केंद्रावर जाऊन समस्त कुटुंबीयांसोबत मतदानाचा सर्वाधिक महत्त्वाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतरचे रितेश आणि जेनेलियाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तर यावेळी रितेश आणि जेनेलिया सोबत रितेशची आई म्हणजेच वैशाली देशमुख देखील पहायला मिळाल्या. मतदानाचा हक्क बजावल्यावर रितेश व जेनेलियाने माध्यमांसोबत संवाद साधला.
तर यावेळी रितेश म्हणाला की, “मी मुंबईहून लातूरला खास मतदान करण्यासाठी आलो होतो. सगळ्या नागरिकांनी घराबाहेर पडून नक्की मतदान केलं पाहिजे कारण, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज रात्री परतीची ट्रेन आहे आमची…त्याने आम्ही परत मुंबईला जाणार आहोत. ऊन प्रचंड आहे. पण एक दिवस थोडा त्रास सहन करा… आपण आपल्या देशासाठी एवढं करूच शकतो. प्रत्येकाला वाटतं की, एका मताने काय फरक पडणार पण, प्रत्येकाचं एक-एक मत महत्त्वाचं असतं.”
तसेच त्याच्या सुरात सूर मिसळत जेनेलिया पुढे म्हणाली की, “आजचा दिवस महत्त्वाचा असल्याने प्रत्येक नागरिकाने मतदान करणं गरजेचं आहे” रितेशने लातूरमध्ये आई व पत्नीसह मतदानाचा अधिकार बजावला. तसेच यावेळी रितेशने राजकारणात प्रवेश करण्याच्या सगळ्या चर्चा फेटाळल्या. तो म्हणाला, “माझे दोन भाऊ असताना माझी काय गरज? सध्या मतदानाचा टक्का घसरत आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी फक्त आवर्जुन मतदान करा.”
तर तमाम जनतेला त्याने मतदान करण्यसाठी आवाहन केले आहे.