मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक गाजलेलं नाव म्हणजे ‘भरत जाधव.’ अभिनेते भरत जाधव यांनी आजवर अनेक नाट्य कलाकृती सादर केल्या. श्रीमंत दामोदरपंत, सही रे सही ही त्यांची गाजलेली नाटकं.
ही नाटकं सादर होऊन आज बरीच वर्षे झाली, तरी देखील त्यांच्या तेव्हाच्या नाटकांना आजच्या पिढीचा तितकाच भरभरून प्रतिसाद आहे. विनोदी बुद्धीने रसिक प्रेक्षकांना हसवण्यासाठी भरत जाधव यांना मोठा हाथ. नाटकच नाही तर त्यांनी असंख्य जबरदस्त सिनेमे सिनेसृष्टीला दिले. त्यांच्या या अफलातून कलाकृतीला पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक कायम उत्सुक असतात.
रंगभूमी असो वा सिनेमा भरत जाधव असणार म्हणजे काहीतरी नक्की खास असणार याकडे प्रेक्षकांचा भारीच कल. ‘अधांतर’ या नाटकानंतर भरत जाधव यांना अभिनय करताना पुन्हा कधी पाहायला मिळणार याची सर्वचजण वाट पाहत होते. आता भरत जाधव त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण करणार आहे. कारण ते आता लवकरच एका नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भरत जाधव यांचे हे नवीन नाटक म्हणजे ‘अस्तित्व.’
नाटकामध्ये अनेकांच्या आयुष्यातील निरनिराळे अनुभव, क्षण, प्रसंग मांडले जातात. यावेळी एका सर्वसामान्य कुटुंबाच्या अस्तित्वाची आणि कुटुंबातील प्रत्येकाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना कोणकोणत्या संघर्षाला सामोरे जावे लागते हे सांगणारी ही गोष्ट. अस्तित्व या नाटकातून भरत जाधव पहिल्यांदाच विनोदी भूमिकेत नाही तर एका गंभीर भूमिकेत दिसणार आहेत. तर त्यांच्यासोबत अभिनेत्री चिन्मयी सुमित देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत. भरत जाधव यांनी नुकताच या नाटकाचा प्रोमो त्यांच्या इंस्टाग्रामवरून चाहत्यांसोबत शेअर केला. पोस्ट करत त्यांनी लिहिले की, “भरत जाधव एन्टरटेन्मेंट निर्मीत, स्वप्नील जाधव लिखित दिग्दर्शित, दोन अंकी नाटक. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व.”
View this post on Instagram
अस्तित्व या नाटकाबद्दल बोलताना भरत जाधव म्हणाले की, “अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मला ‘अस्तित्व’ या नाटकाची कथा सांगितली. स्वप्निल जाधव हा या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक आहे. रंगभूमीवर तसा तो नवखा असला तरी माझ्या मते नवं-जुनं असं काही नसतं. प्रत्येक चांगला कलाकार त्याच्या अनुभवानं मोठा होत असतो. स्वप्निल अत्यंत हुशार आणि गुणी लेखक-दिग्दर्शक आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “अधांतरनंतर पुन्हा एकदा वेगळी भूमिका साकारणार असल्यानं मी उत्सुक आहेच; शिवाय ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांनादेखील आवडेल अशी आशा आहे.” तर सुरुवातीला या दोन अंकी नाटकाचा पहिला प्रयोग शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी रंगभूमीवर सादर होणार आहे.