स्टार किड असला तरी स्वतः अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत नावलौकिक करणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani). गश्मीरच्या वडिलांनी म्हणजेच मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांनी १४ जुलै २०२३ रोजी अखेरचा श्वास घेतला.
पुण्यातील तळेगावमध्ये राहत्या घरी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या अचानक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. महाजनी कुटुंबीय कितीही हादरून गेले होते तरी त्यांना त्या परिस्थितीत ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला होता. कारण, रवींद्र महाजनी यांच्या अचानक निधनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच ते मृत्यूवेळी एकटे होते. म्हणून गश्मीरला देखील ट्रोलिंगला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागले होते. तर त्या परिस्थतीतही त्याने अनेकांना सडेतोड उत्तर दिले होते. परंतु त्या काळात तो आणि त्याचे कुटुंबीय कोणत्या मनस्थितीत होते, हे कोणालाच माहित नव्हते.
गश्मीर तर मनातून इतका खचला होता की, त्याच्या मनात आत्महत्येसारखा वाईट विचार येऊन गेला होता. आणि तो विचारही त्याच्या मुलाकडे पाहून त्याने मागे घेतला होता. तर आता इतक्या महिन्यानंतर त्याने या गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी गश्मीर म्हणाला की, “माझ्या आयुष्यात असे काही क्षण आहेत, जे सांगायला देखील मला कठीण वाटतात. मला आठवतंय की, वडिलांच्या निधनाच्या दोन आठवड्यांनंतर आणि आई आजारी पडल्यानंतर एका रात्री मी आणि माझी आई बोलत होतो. दोघेही काहीसे त्रासलेले होतो आणि काहीतरी छोट्या गोष्टीवरुन आमच्यात वाद झाला, मला याचा खूपच राग आला.”
आत्महत्येच्या दिशेने पडलेलं पाऊल गश्मीरने मागे कसं घेतलं हे सांगताना तो म्हणाला की, “त्यानंतर मी टेरेसवर गेलो. तेव्हा माझ्या मनात आयुष्य संपवून टाकावं का असा विचार आला. कारण मला ते सहन होत नव्हतं. त्यानंतर अचानक माझ्या डोक्यात असा विचार आला की, अरे माझा ५ वर्षाचा मुलगा आहे. त्याला एक वडील आहेत, ज्यांचा तो आदर करतो. त्याला सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. मी त्याला या जगात आणले आहे. त्यामुळे त्यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी तुमचीच आहे. कधीकधी काही गोष्टी अती प्रमाणात होतात, गोष्टी आपल्याला सांभाळता येत नाहीत. तेव्हा आयुष्य संपवण्याचा विचार येऊ शकतो.”
तसेच शेवटी तो म्हणाला की, “तर मला माझं आयुष्य संपवावंसं वाटलं होतं. आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा तुम्हाला आयुष्य संपवावे वाटते. मी देखील आयुष्य संपवलंही असते, जर माझा चिमुरडा मुलगा शेजारच्या खोलीत झोपलेला नसता. नशिबानं माझी पत्नी आणि मुलगा तिथे माझ्या बाजूला पुण्यात होते. जर ते नसते, तर मी माझं आयुष्य नक्कीच संपवलं असतं. मी त्या रात्रीचा विचार करून अजूनही खूप घाबरतो की, जर मी दुसरा निर्णय घेतला असता, तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं.”
रवींद्र महाजनी यांच्या निधनाला आता वर्ष होत आले आहे, तर आता त्यांच्या मुलाने केलेल्या या खुलासामुळे त्याच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला आहे.