सध्या सर्वत्र गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतोय. यानिमित्त अनेक कलाकार मंडळी विविध ठिकाणी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने बीडच्या परळीमध्ये हजेरी लावली होती. बीडच्या परळीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
‘लावणी’ म्हंटल की चटकन डोळ्यासमोर काही नावं येतात त्यातलचं एक नाव म्हणजे अमृता खानविलकर. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात अमृता खानविलकरने नृत्यांगणेची प्रमुख भूमिका म्हणजेच चंद्रा साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेच, तिच्या अभिनयाला ही भरभरुन दाद दिली. यापूर्वी नटरंग चित्रपटामध्येही अशीच काहीशी भूमिका अमृताने साकारली होती.
View this post on Instagram
अशा या लावण्यवतीचा म्हणजेच अमृता खानविलकरचा परफॉर्मन्स हा परळीच्या नाथ प्रतिष्ठानाने आयोजित केलेल्या लावणी महोत्सवात ठेवला होता. हा परफॉर्मन्स केल्यानंतर सदर गणेश मंडळावर टीका होऊ लागली. यावर अमृता म्हणाली की, ‘लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे. लावणीचा वेगळा मान आहे आणि लावणीचे वेगळे स्थान आहे. लावणीला खालच्या नजरेने पाहणे पाप आहे. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीला दर्शवणारी लावणीचा आदर करायला शिका आणि लावणीला व्ह्यूज मिळवण्यासाठी ट्रोल करू नका तर लावणीचा आदर करा.’
यापुढे अमृता असेही म्हणाली की, ‘लावणी ही शृंगारक असली तरी ती धार्मिक आहे असे मला वाटतं. शृंगार हा एखाद्या स्त्रीने कसा प्रस्तुत करावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे लावणी आहे. एक कलाकार म्हणून एवढीच विनंती करु इच्छिते की, एवढा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम एकतर कोणी करत नाही. जर कोणी करत असेल तर त्याला गालबोट लावू नका’. असं आवाहनही अमृतानं केले. त्यामुळे सध्या अमृताच्या या वक्तव्याची चर्चा होताना दिसतेय. तसेच यावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.