अनेकांना परंपरेने कलेचा, संगीताचा वारसा मिळत असतो. तो जपायचा कसा आणि वाढवायचा कसा हे प्रत्येक पुढच्या पिढीवर अवलंबून असतं. मराठी सिनेसृष्टीत अशी अनेक नाव घेता येतील ज्यांनी परंपरेने मिळालेला कलेचा वारसा जीवापेक्षा जास्त प्राणपणाने जपला वाढवला. यामध्ये एका कलाकाराचं नाव अग्रक्रमाने घेता येईल ते नाव म्हणजे विक्रम गोखले. वडील चंद्रकांत गोखले यांच्याकडून आलेला कलेचा वारसा जपत त्यांनी आपल्या अभिनयाच्या वटवृक्षाखाली कितीतरी चित्रपट मोठे केले आहेत याची गणतीच नाही.
या अवलियाचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी झाला. कौटुंबिक वारसा मिळाल्यामुळे त्यांनी अनेक सामजिक चळवळीमध्ये भाग घेतला होता. त्यांचे चित्रपटसृष्टीशी खूप जुने नाते होते, त्यांचे वडीलचं नाही तर आजी-आजोबाही हाडाचे कलाकार होते. विक्रम गोखले यांनी १९७१ साली अमिताभ बच्चन यांच्या ‘परवाना’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा प्रवास सुरु केला आणि २०१० मध्ये ‘आघात ’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.
विक्रम गोखले यांनी माहेरची साडी, वजीर, नटसम्राट, अनुमती, आधारस्तंभ, खोपा, व्हाट्स अप लग्न, भिंगरी, युथ, बघतोस काय मुजरा कर, गोदावरी यांसारख्या मराठी चित्रपटात तर मिशन मंगल, भूल भुलैया, ब्रम्हास्त्र, हम दिल दे चुके सनम या हिंदी चित्रपटात आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या मोलाच्या कामगिरीमुळे आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
विक्रम गोखले यांना २०१३ मध्ये अनुमती या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला . २०१५ मध्ये विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले. काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्यांच्या आत्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘गोदावरी’ हा चित्रपट आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत त्यांनी गुरुंजींची भूमिका साकारली होती.
अनेक दशके रंगभूमीची सेवा करणाऱ्या या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.