मराठी सिनेसृष्टी आज इतक्या उंचीवर पोहोचली आहे, ती फक्त आणि फक्त आपल्या कलाकारांमुळे. त्याचे खास कारण म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील असंख्य कलाकार हे शून्यातून वर आले आहेत. त्यापैकी एक कलाकार म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता ‘अंशुमन विचारे’ (Anshuman Vichare).
कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा यांसारख्या अनेक कार्यक्रमांतून अंशुमन महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला आहे. तसेच अनेक मराठी सिनेमांमधून अंशुमनने सिनेसृष्टीत देखील त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याचा सुटसुटीत आणि उत्तम अभिनय कायम प्रेक्षकांचे मन जिंकून घेत असतो. तो सोशल मीडियावर देखील कायम सक्रीय असतो. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.
मुंबईत स्वतःच्या हक्काचं एखादं तरी घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, तसंच त्याचं देखील आहे. त्याचं हे स्वप्न देखील आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण, त्याने नुकतेच घर घेतले असून सध्या त्याचं बांधकाम सुरु आहे. पत्नीसह नव्या घराच्या कन्स्ट्रक्शन साईटला भेट दिल्याचा फोटो आणि नव्या घराची आनंदवार्ता त्याने त्याच्या चाहत्यांना दिली. तर आता सध्या नुकताच तो १०० व्या मराठी नाट्य संमेलनात देखील उपस्थित होता. त्यावेळचे त्याचे सर्व कलाकारांसोबतचे फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अंशुमनने पत्नीसह नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्या अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केला. या मुलाखतीसाठी अंशुमन, त्याची पत्नी पल्लवी आणि त्याची मुलगी अन्वी देखील उपस्थित होती. यादरम्यान त्यांनी त्यांची भेट कशी झाली, कुठे झाली, अन् त्यांचं लग्न कसं झालं यावर देखील ते बोलले. तसेच कामाबद्दल बोलताना अंशुमनने काही चांगले चालत असलेले कार्यक्रम अचानक का सोडले? यावर भाष्य केले. आणि हे सर्व झालं तर ते नेमकं कोरोनाकाळात, तेव्हा मग काम सोडून घरी बसल्यावर या दिवसांत त्याला त्याच्या पत्नीची कशी साथ मिळाली, हे ही सांगितले.
View this post on Instagram
अंशुमन म्हणाला की, “२०१९ मध्ये कोरोना सुरु झाला, तेव्हा माझा हास्यजत्रेचा कार्यक्रम चालू होता. नंतर मी बाहेरून शूटिंग सुरु केलं. तेव्हा माझी मुलगी दीड ते दोन वर्षांची होती आणि खरं सांगायचं तर मी मेंटली कंटाळलो होतो. माझा प्रॉब्लेम असा आहे की, मी एखादी गोष्ट किंवा काम एका पिकवर नेल्यावर थांबवतो. कारण, मला असं वाटतं की नवीन काही क्रिएटीव्ह होत नाहीये. आणि चांगली गोष्ट करण्यासाठी आधी थांबावं लागतं. या मताचा मी आहे. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट मी एका लेवलपर्यंत थांबवून नवीन प्रोजेक्ट केले आहेत.” तसेच तो पुढे म्हणाला की, “मी पल्लवीला म्हणालो की मला कंटाळा आला तेच-तेच करून, कारण मी सुरुवातीला कॉमेडी एक्स्प्रेस केलं, फु बाई फु केलं, कॉमेडीची बुलेट ट्रेन केली, मग महाराष्ट्राची हास्यजत्रा चालू होती. अन् मला अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा कंटाळा आला. एक अभिनेता म्हणून थांबतो कारण माझी प्रगती होत नाहीये. तेव्हा ती म्हणाली की, चालेल थांब. मग मी म्हणालो की पुढे कसं करणार तेव्हा ती म्हणाली की, आपल्याला गरज नाही काही जास्त. आपली जेवढी गरज आहे तेवढी भागेल, आपण साधं आमटी-भात, डाळ-भात खाऊन सुखी राहू तर आता प्रॉब्लेम काय?”
तसेच शेवटी तो म्हणाला की, “हा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि मी कोरोनामध्ये प्रोजेक्ट सोडला आणि एक वर्ष मी काहीच काम केलं नव्हतं. पण आम्हाला कधीच काही प्रॉब्लेम आला नाही. हिचा मला इतका सपोर्ट होता ना की मला असं वाटतं असा सपोर्ट मला आयुष्यभर असेल ना तर आयुष्यात मी कुठेही उडी मारू शकतो.”
तर यानिमित्त अंशुमनची ही बाजू देखील त्याच्या चाहत्यांसमोर आली अन् अंशुमनकडून आता चाहत्यांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.