ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध गायिका आरती टिकेकर यांची मुलगी म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री ‘स्वानंदी टिकेकर’ (Swanandi Tikekar). ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’ आणि ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ या मालिकांमधून ती महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली.
मागील काही महिन्यांपासून स्वानंदी तिच्या कामामुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा विवाहसोहळा पार पडला. स्वानंदी ‘आशिष कुलकर्णी’सोबत विवाहबद्ध झाली. आशिष हा सुद्धा कलाक्षेत्रातील असून तो एक उत्तम गायक आहे. २३ जुलै २०२३ रोजी स्वानंदी आणि आशिषचा साखरपुडा पार पडला. तेव्हापासून सर्वचजण त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर २५ डिसेंबर २०२३ रोजी थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि अग्नीच्या साक्षीने त्या दोघांनी लग्नगाठ बांधली.
स्वानंदी आणि आशिष यांच्या संपूर्ण लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. परंतू त्यांची लव्हस्टोरी आणि लग्नाची गोष्ट जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक होते. आता त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता संपली आहे. कारण, आता लग्नानंतर नुकतीच स्वानंदी आणि आशिषची एक मुलाखत झाली. तेव्हा त्यांनी त्यांची ओळख कशी, कुठे आणि कोणामुळे झाली हे सांगितले. तसेच त्यांच्यात मैत्री, प्रेम कसं फुलंत गेलं हेही सांगितलं. तसेच एकमेकांच्या आवडी निवडी आणि त्यांच्या लग्नसमारंभात सर्वाधिक लोकप्रिय झालेलं हॅशटॅग कोणी दिलं आणि त्यांची प्यारवाली लव्ह स्टोरी खूपच मनमोकळेपणाने सांगितली.
स्वानंदी आणि आशिषच्या #ANANDI या हॅशटॅगबद्दल बोलताना स्वानंदी म्हणाली की, “हे हॅशटॅग आम्हाला सुकन्या मावशीनेच दिलं आहे. केळवणाच्या दिवशी मी तिला म्हंटल की, कोणतंच चांगलं हॅशटॅग नाही मिळालं. तेव्हा ती म्हणाली आनंदी, आनंदी करूया आणि मग ठरलं.”
पण हे आनंदी एकत्र आले तरी कसे हे सांगताना दोघे म्हणाले की, “आमच्या दोघांचे कॉमन मित्र-मैत्रिणी आहेत, ते म्हणजे रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्यामुळेच आम्ही भेटलो. जुईचा वाढदिवस होता तेव्हा आम्ही दोघं तिच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो.” पुढे सांगताना आशिष म्हणाला की, “ती मस्त ड्रेस घालून सर्वांसोबत बोलत बसली होती. मला अचानक काय झालं माहित नाही मी गेलो तिच्या समोर आणि म्हणालो की, आपण हाय-हॅलो करणार कशाला उगीच? तू पटकन उठ मला मिठी मार आणि मग मी जाहीर करतो की, आपली मैत्री झाली म्हणून.” पुढे स्वानंदी म्हणाली की, “त्यावर मी लगेचच त्याला फक्त ok बोलून मिठी मारली अन् गप्पांमधून आमची ओळख झाली. त्यातून आम्हांला समजलं की, आशिष माझ्या घरापासून केवळ २-३ मिनिटांवर राहतो.”
View this post on Instagram
या पहिल्या भेटीनंतर त्यांची ओळख वाढली आणि त्यांच्यात बोलणं वाढलं, डेट होऊ लागली. पहिल्याच डेटमध्ये म्हणजे पहिल्या भेटीनंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी आशिषने त्याच्या मनातलं स्वानंदीला सांगून टाकलं. तेव्हाचा किस्सा सांगताना आशिष म्हणाला की, “मी तिला म्हणालो, हे बघ आपली ३ दिवसांची मैत्री आहे. आज आपण ठरवलं की एकमेकांपासून लांब राहायचं तर आपल्या दोघांना काही फरक पडणार नाही. दोघेही एकमेकांच्या आयुष्यात सुखी राहू. पण मला खूप मित्र-मैत्रिणी आहेत, मला तू मैत्रीण म्हणून नको आहेस तर लग्न करतेस का?” “त्यावर मी सरळ त्याला हो बोलून मोकळी झाली.” असं स्वानंदी म्हणाली.
दोघंही कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना तेव्हा एकमेकांना वेळ देणं कठीण होतं. म्हणून आशिष म्हणाला की, “बॅग उचल घरी राहायला ये. म्हणजे शूटिंगव्यतिरिक्त उरलेला सर्व वेळ तू मला दे. मला तुला जाणून घेऊदेत, तुही मला जाणून घे. मग आपण निर्णय घेऊया.” स्वानंदी म्हणाली की, “यानंतर काही दिवसांनी मी पण बॅग उचलली आणि गेली त्याच्या घरी. याच दिवसांत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. काही दिवसांनी आशिषने त्याच्या घरी सांगितलं, मग मी पण माझ्या घरी सांगितलं. आमचा साखरपुडा झाला आणि आता लग्नही झालं.”
तसेच यावेळी स्वानंदी आणि आशिषने त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.