ख्वाडा फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचा ट्रेलर प्रचंड व्हायरल झाला होता, प्रेक्षक खूप आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत होते. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट प्रचंड आवडत आहे. परंतु हा चित्रपट आता थिएटरमध्ये पाहता नाही येणार.
या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रिन न मिळाल्यानं प्रेक्षकांची निराशा झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन उपलब्ध नसल्याची खंत निर्माते आणि दिग्दर्शक भाऊनं बोलून दाखवली आहे.
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाबद्दल बोलताना भाऊराव कऱ्हाडे, मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरात व अभिनेत्री कालिंदी यांना अश्रूही अनावर झाले. याबद्दल बोलताना भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, “हा सिनेमा बंद पडला तर फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. मी ३.५ कोटींचं कर्ज घेऊन हा सिनेमा केला आहे. बऱ्याच बँकांचं कर्ज आहे माझ्यावर, मी सगळी माहिती देतो. माझ्या घरातून पैसे टाकून हा सिनेमा केलेला नाही, एक एक रुपया जोडून आम्ही यासाठी मेहनत घेतली आहे. अशी जर गळचेपी होत असेल तर हा एकप्रकारे कलाकारांचा खून आहे. आमची फक्त एकच माफक अपेक्षा आहे की, जे आमच्या वाट्याला यायचं आहे ते येऊ द्यावं.”
View this post on Instagram
हे देखील वाचा : मराठी कलाकारांनी ५० डिग्रीमध्ये केले ‘बलोच’ सिनेमाचे शूटिंग
त्या नंतर मेकर्सच्या वतीनं एक प्रसिद्धीपत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, रसिक प्रेक्षकहो नमस्कार, मला माहिती आहे तुम्हाला ‘टीडीएम’ सिनेमा थिएटरमध्ये बघायची इच्छा आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मी ‘टीडीएम’चे प्रदर्शन तूर्तास थांबवत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तुम्ही करत असलेल्या सहकार्यासाठी सर्वांचे मन:पूर्वक आभार! अशा शब्दांत दिग्दर्शक कऱ्हाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
पुण्यामध्ये ‘टीडीएम’ ला केवळ २० शो मिळाल असल्याच भाऊराव कऱ्हाडे यांनी सांगत खंत व्यक्त केली आहे. यामुळे प्रेक्षक देखील नाराज आहेत. आता हा सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा कधी पाहता येणार यांची प्रेक्षक देखील वाट बघत आहेत. अनेकांनी सोशल मिडियावर खंत देखील व्यक्त केली.