भारतीय सिनेसृष्टीतील प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील असे अनेक सिनेमे आहेत, त्यांपैकी एक म्हणजे १९७५ मधील ‘शोले’. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, अमजद खान आणि हेमा मालिनी यांसारख्या दिग्गज कलाकारांमुळे हा सिनेमा जबरदस्त गाजला. खरं तर या सिनेमातून या सर्व कलाकारांना एक खास ओळख मिळाली होती. त्यातूनच त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.
या सिनेमामधील अमिताभ बच्चन यांनी साकारलेली जय आणि धर्मेंद्र यांची विरू ही भूमिका म्हणजेच जय-विरू ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली, इतकी की आजही ती प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते.
धर्मेंद्र यांना या सिनेमात विरू ही भूमिका नको होती, तर त्यांना ठाकूरची भूमिका हवी होती. यामुळे त्यांनी दिग्दर्शकांकडे त्यांची भूमिका बदलवण्यासाठी खूपवेळा प्रयत्न केला. परंतू रमेश सिप्पी यांनी आधीच संजीव कुमार यांना ठाकूरच्या भूमिकेसाठी निश्चित केले होते. त्यामुळे त्यांनी धर्मेंद्र यांची समजुत घातली. तेव्हा ते धर्मेंद्र यांना म्हणाले की, “जर तू ठाकूर झालास तर तुला कमी सीन्स मिळतील, पण जर तू वीरू झालास तर तुला हेमा मालिनी म्हणजेच बसंतीसोबत रोमान्स करण्याची संधी मिळेल.”
हे ऐकून धर्मेंद्र या भूमिकेसाठी नकार देऊच शकले नाही, शेवटी त्यांची ही भूमिकाच नाही तर संपूर्ण सिनेमाचं ब्लॉकबस्टर ठरला.