भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचे आज वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने सिनेसृष्टीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अभिनेते रवींद्र हे तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावी राहत होते. शुक्रवारी त्यांच्या घरातून दुर्गंध येत असल्याने त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले असता त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. गेल्या काही महिन्यांपासून ते या घरात भाड्याने राहत होते.
रवींद्र यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करीत आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांचे डोळे देखील पाणावले आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडीयावर त्यांच्यासंबंधी स्वतःचे मत मांडताना दिसत आहे. तसेच अभिनेते अशोक सराफ यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अशोक सराफ म्हणाले की. “खूप वाईट घडलंय. आमच्या पिढीतला एकमेव देखणा नट गेला, असं मला वाटतं. तो हिरो आणि मी साईडला असे बरेच चित्रपट आम्ही एकत्र केलेत. आम्ही मिळून बरेच यशस्वी चित्रपट केले आहेत. एक चांगला माणूस, एक चांगला मित्र गेल्याने खूप दुःख होतंय. एक चांगला नट, मित्र गमावल्याचं दुःख मनात कायम राहील. नेहमी हसत खेळत वावरणारा, हसमुख चेहऱ्याचा नट होता. प्रामाणिकपणा हा त्याच्यातला सर्वात मोठा गुण होता, तो प्रत्येक भूमिका उत्तम करायचा. जे करायचा ते मन लावून करायचा, त्यामुळे तो त्या काळातला एक यशस्वी नट होता.”
रवींद्र महाजनी यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये उत्तम कामगिरी केली. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा देखील सध्याचा चर्चेतील अभिनेता आहे. रवींद्र महाजनी हे मराठी सिनेसृष्टीतील विनोद खन्ना म्हणून देखील ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.