बिग बॉसचं घर असो वा खरे आयुष्य राखी सावंतचा ड्रामा हा संपता संपत नाही. त्यामुळे तिला सिनेसृष्टीतील ड्रामा क्वीन म्हणून ओळखले जाते. तर ही ड्रामा क्वीन बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर आधी बिग बॉसमुळे तर नंतर तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली.
आजवर राखी तिच्या वैवाहिक जीवनातमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत आणि आदिल खानने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केले त्यानंतर त्यांनी निकाहही केला होता. परंतू हे सर्व त्यांनी गुपचूप केले होते. लग्नाच्या अवघ्या सात महिन्यांनंतर राखीने त्यांच्या लग्नाचा खुलासा केला होता.
आदिल खान सध्या तुरुंगात आहे. इराणी महिलेने त्याच्यावर बलात्कार आणि मारहाण, फसवणुकीचे आरोप केले आहेत. तसेच अश्लील व्हिडिओ बनवल्याचे आरोप देखील आदिलवर करण्यात आले आहे. यादरम्यान राखीच्या भावाने एक मोठी घोषणा केली आहे.
कायम चर्चेत असलेल्या राखीच्या आयुष्यावर आधारित आता चित्रपट येणार आहे. राखीचा भाऊ राकेश सावंतने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या बद्दलचा खुलासा केला आहे. तेव्हा त्याने सांगितले की, “राखी राऊडी आहे. तिच्या आयुष्यात अडथळे निर्माण करणाऱ्या कोणालाही राखी सोडत नाही. त्यामुळेच मी तिच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार आहे. पती आदिल खानविरोधात ती लढा देत आहे. परंतू फक्त यामुळेच मी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतलेला नाही. तर राखीने आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे.”
तसेच त्याने सांगितले की राखीच्या आयुष्यावरील आधारित चित्रपटाचे नाव ‘राऊडी राखी’ असे आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन राखीचा भाऊ राकेश करणार असून गौरव अग्रवाल या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटात राखी मुख्य भूमिकेत दिसणार असून सयाजी शिंदे, अनू कपूर, मनोज जोशी हे कलाकार देखील या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.