नसीरुद्दीन शहा व ओम पुरी हे दोघेही हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार असून ते चांगले मित्र देखील होते.
ते दोघेही फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात एकत्र शिक्षण घेत होते. दोघांचीही खूप जुनी मैत्री असून दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे.
नसीरुद्दीन यांच्यासोबत १९७७ मध्ये एक घटना घडली त्यामध्ये मुंबईच्या एका रेस्टॉरंट बाहेर त्यांच्या एका मित्रानेच त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यावेळी नसीरुद्दीन यांचा जीव वाचवण्यासाठी ओम पुरी यांनी त्या हल्लेखोराशी दोन हात केले होते.
या घटनेचा उल्लेख त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये करत असं लिहिलंय की, “जसं माझ्यावर हल्ला झाला. तसं ओम पुरी हल्लेखोरावर तुटून पडले आणि त्याला नियंत्रित केले.” त्यानंतर यांनीच त्यांना दवाखान्यात दाखल केले होते.
नसीरुद्दीन यांनी सांगितले की, “आम्ही तेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. मी आणि ओम रात्री जेवण करत होतो. त्याच वेळी जसपाल तेथे पोहोचला. त्याच्या मनात माझ्याविषयी राग होता. जसपालने ओमला नमस्कार घातला. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर माझ्या कमरेत काहीतरी धारदार वस्तू घुसल्याचे जाणवले. मग मी पाहिले जसपाल रक्ताने माखलेले चाकू घेऊन समोर उभा होतो.”
त्यांनी पुढे लिहिले की, “जसपालने पुन्हा चाकूचा वार करण्याचा प्रयत्न केला. ओमने आणि दोन लोकांनी त्याला नियंत्रित केले. त्यानंतर मला दवाखान्यात नेण्यापूर्वी पोलिसांची प्रतिक्षा करत असलेल्या रेस्टाॅरंट व्यवस्थापकाबरोबर ओम वाद करु लागला. बऱ्याच वेळेनंतर आम्ही कपूर दवाखान्यात गेलो होतो.”
नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्या जिवाभावाच्या मैत्रीची आज ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने नव्याने आठवण येते.