कैलाश खेर हे एक प्रसिद्ध गायक आहेत, त्यांची गाणी लोकांच्या मनावर राज्य करतात. परंतु कैलाश खेर यांना काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, त्यांना बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन करण्यासाठी खूप धडपड करावी लागली होती. कैलाश खेर यांनी त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार, गाण्याच्या संधी आणि आतापर्यंतचे काम करताना आलेले अनुभव एका मुलाखतीत शेअर केले.
“मी जगण्यासाठी अनेक नोकर्या केल्या, मिळेल ती कामं केली. मी २०-२१ वर्षांचा असताना दिल्लीत एक्सपोर्टचं काम करू लागलो. जर्मनीला हँडिक्राफ्ट्स म्हणजेच हस्तकला पाठवायचो. पण, दुर्दैवाने तो व्यवसाय अचानक कोलमडला. व्यवसायात अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर मी ‘पंडित’ बनण्यासाठी ऋषिकेशला गेलो. पण तिथे मी फिट बसत नसल्याचं मला लक्षात आलं, कारण तिथले माझे सहकारी माझ्यापेक्षा लहान होते आणि माझे विचार त्यांच्याशी कधी जुळले नाहीत. मी प्रत्येक गोष्टीत अयशस्वी होत असल्याने निराश झालो होतो, म्हणूनच एके दिवशी मी गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.” असं कैलाश खेर यांनी सांगितलं.
पुढे कैलाश खेर म्हणाले, “मी उडी घेतल्यावर घाटावरील एका व्यक्तीने लगेच गंगेत उडी मारून मला वाचवले. त्याने विचारले, ‘तुला पोहायला येत नसताना उडी का मारलीस?’ मी उत्तर दिले, ‘मरायला’…त्यानंतर त्या व्यक्तीने माझ्या डोक्यावर मारलं होतं, त्यानंतर मला आयुष्याचा अर्थ उमगला, जीवनाचं मूल्य कळालं.”
२० वर्षांच्या करिअरमध्ये कैलाश खेर यांनी ‘तेरी दीवानी’, ‘सैयां’, ‘चांद सिफारिश’, ‘यूही चला चल राही’, ‘या रब्बा’ आणि ‘अर्जियां’ सारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.