२०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हजारो देशभक्तांनी आणि शूर वीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावून स्वातंत्र्य मिळवले. आज देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. अशा सुवर्णक्षणी आवर्जून ऐकले जाणारे, गायले जाणारे गाणे म्हणजे ‘ऐ मेरे वतन के लोगो’ जे लतादीदींनी गायले आहे. हे देशभक्तीपर गीत कवी प्रदीप यांनी लिहिले असून सी. रामचंद्र यांनी संगीत दिले आहे. भारतीय सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हिंदी भाषेत लिहिलेले एक देशभक्तीपर गीत आहे. हे गीत प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविते.
हे गाणे ऐकून आजही प्रत्येकवेळी सहज डोळे पाणावतात. आपलेच काय देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूही हे गाणे ऐकून रडले होते. पण हे गाणे कसे घडले माहीत आहे का? त्यामागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. १९६२ च्या चीनसोबतच्या युद्धात भारताचा पराभव झाला. त्यामुळे भारतात मोठी उलथापालथ झाली. संपूर्ण देशाचे मनोधैर्य खचले, राजकीय नेते हताश झाले. देशापुढे आलेल्या या भयंकर संकटाशी कसे लढायचे हाच मोठा प्रश्न होता. त्यावेळी देशाला प्रोत्साहन देण्यासाठी कलाविश्वाने पुढे यावे अशी मागणी सर्वस्तरातून झाली.
तत्कालीन सरकारने देशाला धीर देता येईल असे काही करावे अशा सूचना मनोरंजन विश्वाला देण्यात आल्या. त्यावेळी देशभक्तीपर गीते लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांनी पुढाकार घ्यावा असे त्यांना सांगण्यात आले आणि त्यातूनच ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्याचा उगम झाला.
ऐ मेरे वतन के लोगो हे गीत सर्वप्रथम दिल्लीतील रामलीला मैदानावर दिनांक २७ जानेवारी, इ.स. १९६३ रोजी झालेल्या एका कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायले.
१९६३ मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी हे गाणं दिल्ली येथे गाण्याची ही ऑफर होती. या गाण्यावर सराव करणे हे दिदींना वेळेअभावी शक्य नव्हते. त्यावेळी लतादिदी खूपच व्यस्त असल्याने त्यांनी या गाण्याला नकार दिला. परंतु कवी प्रदीप यांच्या प्रचंड विनवणी नंतर त्यांनी गाण्यासाठी होकार दिला. परंतु कार्यक्रमाच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा नकार दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे संगीतकार हेमंत कुमार यांनी आशा भोसले यांना या गाण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला, पण त्या मान्य झाल्या नाहीत. अशा परिस्थितीत लता दीदींना एकट्याने गाण्याची तयारी करावी लागली. तसेच या गाण्याला चाल देणारे सी.रामचंद्र हे काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले असल्याने लता दीदींना त्यांच्या रियाझची साथ मिळाली नाही. शेवटी रामचंद्र यांनी दिलेली गाण्याची टेप ऐकूनच लता दीदींना गाण्याचा रियाज करावा लागला. अखेरीस २७ जानेवारी १९६३ रोजी नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियवर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत त्यांनी हे गाणे गायले.