सध्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मल्हार कामत ही प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे ‘अभिजीत खांडकेकर’ (Abhijeet Khandkekar).
मराठी सिनेसृष्टीतील नाटक, मालिका आणि सिनेमांमधून अभिजीतने तमाम रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले. पण सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती माझिया प्रियाला प्रीत कळेना मालिकेतील अभिजीतची भूमिका. त्या मालिकेपासून त्याला चॉकलेट बॉय ही नवी ओळख मिळाली. अभिजीत हा मूळचा परभणीचा, त्याने देखील नाव कमविण्यासाठी परभणी ते स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई हा प्रवास केला. तर त्याचा हा प्रवास कसा होता? त्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? आणि चाहत्यांच्या मनातील अशा अनेक गोष्टींवर अभिजीतने नुकतेच भाष्य केले.
अभिजीतने नुकतीच ‘गप्पा, मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले’ला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने त्याच्या या गोष्टींचा खुलासा केला. तेव्हा तो म्हणाला की, “मी आधी बीड परभणीला होतो. नंतर साधारण पाचवी सहावीत आम्ही नाशिकला आलो. कारण बाबांना तेव्हा असं वाटत होतं की, आमचं शिक्षण चांगल्या ठिकाणी व्हावं. बीड-परभणीला मी बराच काळ घालवला, त्यामुळे माझे उच्चार, माझा लहेजा हा बऱ्यापैकी ग्रामीण होता. त्यात मी वयात येत असल्यामुळे माझा आवाज चिरकायचा, चेहऱ्यावर खूप पिंपल, अत्यंत बारीक दिसायचो मी. त्यामुळे आपण बरे दिसत नाही, आपला आवाज बरा नाही, आपल्याला नीट बोलता येत नाही असं मला वाटायचं. मला तेव्हा परभणीची भाकर म्हणून चिडवायचे.”
तसेच तो पुढे म्हणाला, “तेव्हा तो काळच असा होता, कारण शुद्ध तुपाला पिवर तूप असं म्हटलं जायचं. मराठवाड्यातले काही उच्चार युनिक आहेत. आमच्या घरी अशी भाषा बोलली जायची. शहराकडे आल्यानंतर याच भाषेवर हसलं जायचं. मला असं झालं की, आपलं काहीचं बर नाहीय का? इंग्रजी माध्यमांमध्ये त्याकाळी पाचवीपासून एबीसीडी शिकवायचे. इंग्रजी येत नाही, हिंदी येत नाही, मराठी येतंय त्यावरही हसतायत आपल्याला सगळे, त्यामुळे मी खूप घाबरून गेलो होतो. साधारण सातवी आठवीचा काळ माझ्यासाठी खूप वाईट होता. त्यावेळी मी शिकलो. सगळं वाचायला लागलो. तेव्हा मी ठरवलं होतं, आता मी माझी भाषा बदलूनच राहणार. हा भयंकर न्यूनगंड त्याकाळी माझ्यामध्ये काही काळ होता. मी आज जो काही आहे तो या गोष्टींमधून मी शिकलो म्हणून आहे, असं मला वाटतं.”
शिकत, मोठं होत लोकप्रियता मिळवणारा हा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता कायम त्याच्या कलेतून आपले मनोरंजन करत आहे.