जगातील सर्वात मोठं सुख म्हणजे आई होणे. एका बाईला एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आणि ती बाई त्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी उत्तमपणे पार पाडते. जर एखादी स्त्री नोकरी करत असेल तर तिला नोकरी करत ह्या सगळ्या गोष्टी देखील बघाव्या लागतात.
सध्या सगळीकडे हवा आहे ती म्हणजे ‘नाच गं घुमा’ या सिनेमाची. आणि याचं सिनेमातील आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच नम्रता संभेराव (Namrata Sambherao). फु बाई फु, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमांमुळे नम्रता महराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. नम्रताने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. नम्रताने २०१३ मध्ये योगेश संभेराव सोबत लग्नगाठ बांधली. त्यांनतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला. आई झाल्यानंतर नम्रताने मुल आणि काम एकत्र कसं सांभाळल याबद्दल तिने राजश्री मराठीच्या मुलाखती दरम्यान भाष्य केले.
यावेळी बोलताना नम्रता म्हणाली, “माझ्या आजूबाजूला मी अनेक जणी पाहिल्या ज्यांना गरोदरपणानंतर लगेच काम नाही करता आलं. यामुळे मधल्या काळात तीन ते चार वर्षांचा ब्रेक होतो. मला तसं नव्हतं करायचं मला लगेच कामाला सुरुवात करायची होती आणि यासाठी मला माझ्या सासूबाईंनी खूप जास्त पाठिंबा दिला. आज माझ्या सासूबाई घरी आहेत म्हणून मी बाहेर काम करू शकतेय. गरदोर असताना सातव्या महिन्यापर्यंत मी हास्यजत्रा केलं आणि त्यानंतर डिलिव्हरी झाल्यावर बरोबर चौथ्या महिन्यापासून मी कामाला सुरुवात केली. मला कामासाठीचा पहिला फोन गजेंद्र अहिरेंचा आला होता. ‘बिडी बाकडा’ नावाचा मी चित्रपट केला होता. तेव्हा रुद्राज फक्त दोन महिन्यांचा होता. तेव्हा मी योगेशला म्हटलं अरे कसं करायचं सरांचा फोन आलाय. तेव्हा माझा नवरा म्हटला ‘तुला करायचं ना? विषयही चांगला आहे तू कर आपण काहीतरी करूया.”
पुढे नम्रता म्हणाली, “मला सरांनी समोरून सांगितलं मी तिथे तुझी सगळी सोय करतो. सेटपासून जवळ तुला हॉटेल देतो. जेणेकरून यायला-जायला सोपं पडले. त्यावेळी मी, रुद्राज, आई, योगेश आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. रुद्राजची दुपटी, खिमटी असा एका बाळंतिणीचा संपूर्ण संसार घेऊन मी महिनाभर कोल्हापूरला राहिले. शूटिंग पूर्ण केलं या सगळ्यात मला योगेशने खूप मोठी साथ दिली. त्यानंतर मग पाचव्या महिन्यात मी हास्यजत्रा सुरू केलं.”
यावरून एखादी बाई एकाच वेळी एक नाही तर अनेक काम कामं करू शकते हे नम्रताने दाखवून दिले.