‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला अभिनेता ‘गौरव मोरे’ (Gaurav More) हा आता फिल्टरपाड्याचा बच्चन या नावाने देखील ओळखला जातो. एकांकिका, प्रायोगिक, व्यावसायिक नाटक त्यानंतर मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून गौरव मोरे आपल्याला अभिनय करताना दिसतो. विनोदी भूमिका करण्याबरोबरच त्याने काही गंभीर भूमिकासुद्धा साकारल्या आहेत.
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या माध्यमातून गौरवने मालिकाविश्वात पदार्पण केले. अनेक मालिका आणि चित्रपट करत असतानाही गौरवनं रंगभूमीशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवली. व्यावसायिक रंगभूमीवर तो काम करत असताना मराठी चित्रपट आणि मालिकेतील त्याचं काम पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतूनही त्याला काही भूमिकांसाठी विचारण्यात आले.
View this post on Instagram
गौरव हा गोरेगाव मधील आरे परिसरातील फिल्टरपाड्यात राहत असून त्याच पवईमध्ये आता स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचं त्याचं स्वप्न आहे, असं त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. मागील वर्षात बऱ्याच मराठी कलाकारांनी मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काच घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केल आहे. यामध्ये अक्षय केळकर, पृथ्वीक प्रताप, ऋतुजा बागवे, अश्विनी महांगडे, सई ताम्हणकर अशा बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे. तसेच गौरवने देखील मुंबईमधील पवई येथे घर घेण्याचं स्वप्न पाहिलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या घराच्या स्वप्नाबद्दल सांगितलं.
गौरव म्हणाला की, “मला स्वतःचं घर घ्यायचे आहे. मी खूप मोठं घर घेणार आहे. माझे ठरले आहे. तेही पवई हिरानंदाणीमध्ये घ्यायचे आहे.” तसेच तो पुढे म्हणाला की, “बालपणी मी हिरानंदाणी गार्डनमध्ये खेळायला जायचो. तिथे रंगबेरंगी मासे असायचे ते आम्ही बघायला जायचो. तेव्हा तिथे गगनचुंबी इमारती पाहून खूप भारी वाटायचं. आता ते आणखी विकसित झाले आहे. तिथे घर असावे हे आमच्या संगळ्यांच स्वप्न आहे. वरच्या मजल्यावर राहून घरातून पवई पहायचे माझे स्वप्न आहे आणि हे स्वप्न मी लवकरच पूर्ण करणार आहे.”
गौरव जरी आज यशस्वी अभिनेता असला तरी त्याने एकांकिका स्पर्धांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. तसेच तो बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांचा फॅन आहे. बऱ्याचदा त्याने एकांकिकेत बिग बी सारखी एंट्री देखील घेतली आहे. गौरवने बॉईज ४ या चित्रपटात काम केलं असून आता लवकरच तो एका हिंदी चित्रपटामध्ये झळकणार असून ‘सांगी’ असं या चित्रपटाचं नाव आहे.