‘खाकी २’ – पुन्हा एकदा अनुभवता येणार खाकीचा रुबाब :
खाकी वर्दीच्या पराक्रमाची गोष्ट सांगणारा एक रक्तरंजित सिनेमा २० वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, तुषार कपूर, ऐश्वर्या राय, अजय देवगण, अतुल कुलकर्णी अशी तगडी कास्ट असेलल्या या सिनेमाने त्यावेळेस बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. याच सिनेमाने शाहरुखच्या ‘कल हो ना हो’ या सिनेमासोबत बॉक्सऑफिसवर चांगलीच स्पर्धा केली होती. आता २० वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खाकी वर्दीची रोमहर्षक कथा पाहायला मिळणार आहे. लवकरच खाकी सिनेमाचा सिक्वल येणार आहे.
दिवंगत निर्माते केशू रामसे यांचे सुपुत्र अभिनेता व निर्माता आर्यमन रामसे यांनी दिलेल्या मुलाखतीत या बातमीवर शिक्कामोर्तब केले. तब्बल २० वर्षांनंतर ‘खाकी’चा सीक्वल बनणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
एका मुलाखतीदरम्यान आर्यमन रामसे म्हणाले, “हो आम्ही ‘खाकी’च्या सीक्वलच्या स्क्रिप्टवर काम करत आहोत. आमच्याकडे एक मूळ कथा तयार आहे. पुढच्या वर्षापर्यंत या चित्रपटावर काम सुरू होईल अशी आशा आहे.” याहून अधिक माहिती त्यांनी दिलेली नसली तरी ही एक नवीन कथा आहे जी आजच्या काळाशी सुसंगत असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अक्षय कुमार व अजय देवगण हे लोकप्रिय कलाकार ‘खाकी’ या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. तसेच सिनेमांमधील काही पात्र सिनेमाच्या पहिल्या भागात मृत्युमुखी पडलेली असल्याने येणाऱ्या नवीन सिनेमामध्ये नवीन कलाकार कोण असणार हे अजून समजलेले नाही. तसेच जसं कथेचं काम पूर्ण होईल तसं या चित्रपटात नेमकं कोणाला घेता येईल यावर विचार करता येईल असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा खाकीचा रुबाब पाहायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. पण खाकीचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.