कोरोना काळात अनेकांची दयनीय अवस्था झाली असताना याच काळात सोनू सूदने असंख्य गरजूंना मदतीसाठी हात पुढे केला. तेव्हापासून लोक त्याला देवाच्या रुपात पाहू लागले.
देशभरातील लोकांच्या नजरेत सोनू सूदबद्दल खूप आदर आणि आपलेपणाची भावना आहे. पण लोकांच्या मदतीसाठी तो एवढा पैसा आणि साधने कुठून आणतो. या बद्दल आत्ताच त्याने भाष्य केले आहे. सोनु सूद नुकताच ‘आप की अदालत’ या शोमध्ये दिसला. तर या शोमध्ये रजत शर्मा यांनी सोनू सूदला विचारले की, “लॉकडाऊनच्या काळात तू अनेक मजूर आणि विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यासाठी मदत केलीस तर त्यासाठी पैसे कुठून आले?”
या प्रश्नाचे उत्तर देताना सोनू सूद म्हणाला की, “जेव्हा मी हे सर्व सुरू केले, तेव्हा मला माहित होते की लोकांची मागणी ज्या पातळीवर येत आहे, तिथे मी दोन दिवसही टिकू शकणार नाही. त्यामुळे मी विचार केला की यात आणखी कशी भर घालायची, मी ज्या ब्रँडवर काम करत होतो ते सर्व चॅरिटीसाठी ठेवले होते. या कामासाठी मी हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, कॉलेज, शिक्षक, फार्मास्युटिकल कंपन्यांना काम लावले. मी म्हणालो, मला माझा ब्रँड लुक हवा आहे, मी फुकट काम करेन, असे म्हणून ते जॉईन होत राहिले आणि काम आपोआप झाले.”
तसेच पुढे तो म्हणाला की, “काही मोठ्या एनजीओने मला बोलावले, सांगितले की सोनू देशाची 130 कोटी लोकसंख्या आहे, तू करू शकणार नाहीस, मी म्हणालो, माझ्या घराखाली येणाऱ्यांना मी नाकारू शकत नाही. आज जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत, कोणत्याही लहान जिल्ह्यात किंवा लहान राज्यात, कोणीही, कुठेही, तुम्ही बोलू शकता, मी कोणालाही शिकवू शकतो, मी कोणालाही उपचार मिळवून देऊ शकतो, मी कोणालाही नोकरी मिळवून देऊ शकतो, तुम्ही कॉल करा, मी ते करून देईन.”
या शो दरम्यान सोनू सूदने आणखी एक खास खुलासा केला तो म्हणजे त्याच सोशल मीडिया अकाउंट सांभाळण्यासाठी कोणतीही टीम नाही. तर तो स्वतः त्याचं सोशल मीडिया हाताळतो आणि लोकांना किंवा ट्विटवर उत्तरही देतो. तर सोनू सूद लवकरच ‘फतेह’ या चित्रपटात दिसणार आहे.