बॉलिवूडचा बाजीराव ‘रणवीर सिंग‘ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचा कोणताही सिनेमा किंवा कोणतीही खासगी बाब ही नाही, तर मूळ कारण म्हणजे रणवीरचे एका मागोमाग एक फ्लॉप होत जाणारे सिनेमे.
२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बँड बाजा बारात‘ या सिनेमातून रणवीर सिंग ने त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट सिनेमेही दिले. परंतू मागील काही वर्षांपासून रणवीरचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटले. त्यात ‘जयेशभाई जोरदार’, ‘८३’, ‘सर्कस’ या सिनेमांचा समावेश आहे.
सातत्याने फ्लॉप होणाऱ्या सिनेमांचा परिणाम त्याच्या सिनेसृष्टीतील एकूण कारकिर्दीवर होताना दिसत आहे. त्यात आता आणखी एक मोठी भर पडली आहे. ती म्हणजे यशराज फिल्म्स (YRF) स्टुडिओ अंतर्गत रणवीर सिंगला आता काम करता येणार नाही. सध्या YRF ने रणवीर सोबत कोणताही सिनेमा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
YRF आणि संपूर्ण टीम आता ‘स्पाय युनिव्हर्स’ (YRF Spy Universe) मध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. याअंतर्गत नुकताच ‘पठाण’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा प्रदर्शित झाला आणि आता सलमान खानच्या ‘टायगर ३’ च्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यग्र आहे. त्यामुळे रणवीर सोबत सिनेमा करून लक्ष विचलित करायचे नाही असे सांगण्यात आले आहे.
YRF चा हा निर्णय आणि रणवीरच्या मागील काही वर्षांपासूनची कामगिरी पाहता त्याच्या कारकिर्दीला आता ब्रेक लागतो की काय अशी शंका वाटत आहे.