‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली जोडी ‘अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी’(Akshaya Deodhar And Hardik Joshi) म्हणजेच आपले सर्वांचे लाडके राणा दा आणि अंजलीबाई अभिनयाच्या जोरावर त्यांनी चाहत्यांचे मन जिंकून घेतले. दोघांमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे यांच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. तसेच ही मालिका बंद झाल्यावर मात्र टीव्हीवर आपल्या लाडक्या राणा अंजलीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते. आत्ता खऱ्या आयुष्यातही हे दोघे साताजन्मासाठी एकत्र आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला .
पण ऑनस्क्रीन राणा दा पाठक बाई ते खऱ्या आयुष्यातले नवरा बायको असा त्यांचा प्रवास कशा पद्धतीने जुळला याची संपूर्ण कहाणी त्यांनी दोघांनी नुकतीच एका मुलाखतीत दिली आहे. लव्ह स्टोरी बद्दल सांगताना हार्दिक म्हणाला की, “माझ्या आईने एकदा अक्षयाला विचारलं होतं की, तू मला खूप आवडतेस. माझ्या मुलाशी लग्न करशील का? आणि ही गोष्ट मला दोन वर्षांनंतर समजली. मालिका संपल्यावर माझी आई खूप मागे लागली होती. अरे तिला एकदा तरी विचार…पण, मी म्हटलं जेवढं आता ती माझ्याशी बोलतेय तेवढंही बोलणार नाही. ते सुद्धा बंद करेल.”
तसेच हार्दिक पुढे म्हणाला की, “आईशी बोलणं झाल्यावर मी थेट अक्षयाच्या घरी गेलो होतो आणि तिच्या आई-बाबांना सांगितलं. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. अशाप्रकारे सगळं जुळून आलं. त्यानंतर आमच्या साखरपुड्यात मी अक्षयाला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं.” अशी ही प्रेमकहाणी खरंच त्यांच्या चाहत्यांना अवाक् करणारी आहे.
सध्याच्या हार्दिकचा ‘जाऊ बाई गावात’ या शोला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जाऊ बाई गावात या कार्यक्रमात दर आठवड्याला स्पर्धकांना सरप्राईज देण्यासाठी नवनवीन पाहुणे येतात. पण, या आठवड्यात स्पर्धकांसह या शोचा सूत्रसंचालक हार्दिक जोशीला खास सरप्राईज मिळणार आहे. १४ तारखेला संपूर्ण देशभरात मकरसंक्रांत साजरी करण्यात येणार आहे. वर्षातील या पहिल्या सणाच्या निमित्ताने या कार्यक्रमात हार्दिकची पत्नी अक्षया देवधरने देखील हजेरी लावली. संक्रांतीनिमित्त जाऊ बाई गावात या कार्यक्रमात जाण्यासाठी अक्षया देवधरने पारंपरिक लूक व काळ्या रंगाची पैठणी साडी नेसली. तिळगुळाचा गोडवा आणि रंगीबेरंगी पतंगाची बहार घेऊन राणादाच्या पाठकबाई लवकरच या शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. अक्षयाच्या येण्याने हार्दिकसाठी शोमधील ही संक्रांत नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.
आणखी खास गोष्ट म्हणजे प्रेक्षकांच्या लाडक्या राणादाने यावेळी ‘जाऊ बाई गावात’च्या रंगमंचावर पाठकबाईंना पुन्हा एकदा गुडघ्यावर बसून प्रपोज केलं.