सचिन गोस्वामी यांनी सांगितले महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून कलाकारांच्या एक्झिटचे कारण:
मराठी भाषेतील सर्वांचा आवडता विनोदी शो म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार रसिक प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न करत असतो. या शोमुळे अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. पण आता मात्र बहुतेक कलाकार शोमधून एक्झिट घेताना दिसून येत आहेत.
या शो मधील मराठी सिनेसृष्टीतील विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तिने ‘फू बाई फू’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा अनेक विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवले. विशाखाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विशाखा प्रचंड चर्चेत असायची. शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी व सचिन मोटे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विशाखाने शो का सोडला त्याबद्दल भाष्य केले.
आत्ताच दिलेल्या मुलाखतीत सचिन मोटे म्हणाले, “विशाखा सोडून गेली तेव्हा आमची खूप चर्चा झाली होती. ती म्हणाली होती की मी मागची १० ते १२ वर्षे हेच करतेय. ती ‘फू बाई फू’च्या पहिल्या पर्वाची विजेती होती. तेव्हापासून ते आतापर्यंत ती स्किट करतेय. तिने बरेच कॉमेडी शो केले, त्यामुळे आता या जॉनरपासून ब्रेक हवाय, असं तिचं म्हणणं होतं. शो सोडून गेलेले सगळे सांगून बाहेर पडले, कोणीही वादामुळे किंवा आमच्याशी खटके उडाल्याने सोडून गेलं नाही.”
सचिन गोस्वामी म्हणाले, “जुन्यांना यापेक्षा मोठी संधी मिळाली की ते पुढे जातात, त्यांच्याजागी इतरांना संधी मिळते, त्यामुळे जून्यांनी जाणंही गरजेचं असतं. विशाखाचं आमच्याशी बोलणं होतं, ती मेसेज करत असते.” सचिन मोटेंनी कलाकारांचा दृष्टीकोनही सांगितला, तेव्हा ते म्हणाले की, “या क्षेत्रात येणारा प्रत्येक जण हा कलाकार आहे. त्याला आयुष्यभर एकच गोष्ट करायची असती तर त्याने नोकरी केली असती ना.”
पुढे सचिन गोस्वामी म्हणाले, “विशाखाला हे माहीत असतं की ती गेल्यामुळे शो बंद होणार आहे, तर ती नक्कीच गेली नसती. कारण या कार्यक्रमात तिचा जीव आहे. ज्या टीमबरोबर आपण इतका छान काळ घालवला, त्याचं नुकसान व्हावं असं कुणाला वाटत नाही. त्यांना माहीत असतं की आपली जागा कुणीतरी घेईल, थोडा काळ लोक हळहळतील पण शो सुरू राहील. नदी वाहते म्हणूनच पाणी स्वच्छ आहे, रुचकर आहे, नाही तर त्याचंही डबकं झालं असतं.”
सचिन मोटे व सचिन गोस्वामी स्वतःला ब्रेकची गरज असल्याचंही सांगतात. तेव्हा ते म्हणले की, “आम्हीही जवळपास १० वर्षे हेच काम करतोय, आम्हालाही वाटतं की नाटकं, सिनेमे करावे, मनासारखं काहीतरी करावं पण होत नाही. आम्ही दोघांनीही हा शो सोडला तरी तो सुरूच राहील. आम्ही गेल्याने शो बंद पडणार नाही. चॅनल आम्हाला बोलेल की तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे, बाकी काही नाही. आमच्यामुळे अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे, त्यामुळे आम्ही तडका-फडकी सोडून जाणार नाही,”
असे असले तरीही आज महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आहे.