मराठी सिनेसृष्टीत असे अनेक मराठी सिनेमे आहेत जे कित्येक वर्ष उलटून गेले तरीही आपल्या लक्षात आहेत. त्यातील प्रत्येक पात्र, प्रत्येक गाणी, डायलॉग आपल्या चांगल्याच लक्षात राहतात. मराठी सिनेसृष्टीतील असाच एक सिनेमा म्हणजे ‘दुनियादारी’(Duniyadari). दुनियादारी हा असा सिनेमा आहे ज्याने प्रेक्षकांना हसवलं आणि रडवलं देखील. हा सिनेमा जणू काही प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांनी केले होते.
हा सिनेमा प्रदर्शित होऊन १० वर्षे उलटली. तरीही या सिनेमातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहेत. मैत्री, प्रेम, जिव्हाळा हे सगळचं आपल्याला या एका सिनेमामध्ये पाहता आले आहे. पण सर्वाधिक भावणारी गोष्ट म्हणजे सिनेमातून प्रेक्षकांसमोर ठेवलेली मैत्री. या सिनेमातील गाणी देखील प्रचंड गाजली. आजही सिनेमातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत.
या सिनेमात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, वर्षा उसगांवकर, उर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, सुशांत शेलार, रिचा परीयाल्ली, योगेश शिरसाट असे मोठे आणि तगडे कलाकार या सिनेमात आहेत. या सगळ्या कलाकारांमुळे हा सिनेमा चांगलाच गाजला होता. तसेच श्रेयस, डीएसपी, मिनू, शिरीन, प्रीतम, साई, सुरेखा, एम. के. ही पात्र सगळ्यात जास्त गाजली. या सिनेमात शिरीन ही भूमिका अभिनेत्री सई ताम्हणकर हिने स्कारली होती. ही भूमिका आधी अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’ला ऑफर करण्यात आली होती. तेजस्वीनीची जागा या सिनेमात फिक्स झाली होती. पण अचानक ही भूमिका सईला देण्यात आली, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काही दिवसांपूर्वी बोलताना तेजस्विनीने याबद्दल खुलासा केला होता. त्यावेळी ती म्हणाली की, “जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं, तेच तुम्हाला मिळतं. एखादी गोष्ट तुमच्या नशिबात लिहिलेली नसेल तर ती तुम्हाला मिळणार नाही. दुनियादारी फिल्म माझी होती. शिरीनचा रोल माझा होता. १६ डिसेंबरला माझं लग्न होतं. २० पासून दुनियादारी सिनेमाचं शूट होतं. संजयदादाने सांगितलं होतं मेंहदी काढायची नाही. मी माझं लग्न असताना मेंहदी देखील काढली नव्हती. पण दुसऱ्यादिवशी बाबांनी सकाळी पेपरमध्ये दुनियादारीची बातमी वाचली त्यात माझं नावं नव्हतं. त्यानंतर मी सगळ्यांना फोन करून विचारलं पण, कुणीच नीट उत्तरं दिली नाही. मला आजही या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही.”
त्यामुळे यामागील खरं कारण आजही गुलदस्त्यात आहे.