आपले लाडके कलाकार देखील अभिनयासोबत आपली अनेक स्वप्न जगत असतात. काहींना खाण्याची, काहींना देव दर्शनाची तर काहींना निसर्गाची आवड असते. निसर्गाची आवड असलेली अशी आपली लाडकी अभिनेत्री म्हणजे ‘प्राजक्ता माळी’ (Prajkta Mali).
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्राजक्ता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे प्राजक्ता प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे प्राजक्ताचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे ती असलेला शो, मालिका किंवा सिनेमा चांगलाच चालणार यात तीळमात्र ही शंका नसते. तिच्या या प्रसिद्धीमुळे तिचे मानधन देखील भारीच असते. एका सिनेमासाठी ती लाखोंच्या घरात मानधन घेते, हे आपणांस ठाऊक आहे.
परंतू तिची पहिली कमाई किती हे आजवर कोणालाही माहित नव्हते. पण आता प्राजक्ताने नुकतीच एक मुलाखत दिली, त्यावेळी तिने तिचे पहिले मानधन सांगितले. तेव्हा ती म्हणाली की, “मी खूप लहानपणापासून काम करत आली आहे. सहावी ते सातवीत असताना मी खूप डान्सचे कार्यक्रम केले, त्यावेळी मला कमी पैसे मिळायचे. ‘तांदळा एक मुखवटा’साठी तब्बल चार हजार रुपये मिळाले होते. ही इंडस्ट्रीतली माझी पहिली कमाई होती.” तसेच ती पुढे म्हणाली की, “मला ‘गुड मॉर्निंग महाराष्ट्रा’साठी दर महिन्याला ५८ ते ६० हजार रुपये मिळायचे. या पैशांतून माझा प्रवास खर्च, माझे शिक्षण व माझा इतर खर्च भागत होता. या पैशांतून मी घरी खर्चालाही पैसे देत होते, त्यामुळे त्या कमाईतून मला आनंद झाला होता.”
यावेळी प्राजक्ताने तिच्या खाजगी आयुष्याबद्दलही काही गोष्टी सांगितल्या. आज प्राजक्ता अनेकांची क्रश असली तरी तिचं नक्की कोणावर प्रेम आहे? तिचं लग्न आणि प्रेम याविषयी काय मत आहे, यावर ती खूपच स्पष्टपणे बोलली. तेव्हा ती म्हणाली की, “डोक्यांची मंडई होणार असेल तर मला लग्न करायंच नाही. शांततेला माझ्या आयुष्यात प्राधान्य असेल. कारण, डोक जागेवर नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. एक लाइफ पार्टनर तुमचं सगळं आयुष्य बदलवू शकतो. तुमचं जगणं, भविष्य, मेंटल हेल्थ सगळंच बदलून जातं. त्यामुळे मला वाटतं लग्न ही एक रिस्कच आहे. प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा या तीनच गोष्टींवर नातं टिकतं. या कलियुगात याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. ते नातं जर खरं असेल तरच टिकेल.” तसेच ती पुढे म्हणाली की, “मी प्रेमात पडते. पण, नंतर मला कळतं की हे शेवटपर्यंत नसेल. मग मी त्यातून बाहेर पडते. आपण थांबूया असं मी पाच वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. तो माझ्याशी खोटं बोलायचा आणि मी त्याला पकडलं होतं. पण, तो ते मान्यच करत नव्हता. तुमच्यात खरं बोलण्याची हिंमत पाहिजे.”
आजवर प्राजक्ताने अनेक शो, मालिका आणि सिनेमे केले. जवळपास सर्वच शो आणि मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. परंतू तिच्या सिनेमांना पाहिजे तेवढी लोकप्रियता अजूनही मिळालेली नाही, हे ही तितकेच खरे. तर याबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली की, “मला पहिला चित्रपट पटकन मिळाला. त्यानंतर केदार शिंदेंची खो खो केला. पण, सई ताम्हणकर, सोनाली, हृता यांच्या नावावर टायटल गेल्या असलेले चित्रपट आहेत. पण, माझ्यावर नावावर असा चित्रपट नाही. किंवा माझ्या नावावर ‘सैराट’, ‘दुनियादारी’सारखा सुपरहिट सिनेमा नाही.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “मला टेलिव्हिजन मध्ये स्ट्रगल करावा लागला नाही. माझे सगळ्या मालिका आणि शो हिट गेले. पण, चित्रपट हिट करण्यात स्ट्रगल करावा लागत आहे. मी खूप वेळ टेलिव्हिजनचा चेहरा बनून राहिले. त्यामुळे कमर्शियल फिल्म वाट्याला आल्या नाहीत. माझे आधीचे चित्रपट न चालल्यामुळे दुसऱ्या चित्रपटांत वर्णी लागली नाही. हास्यजत्रेमुळे मी वेळ नाही देऊ शकणार, असं काहींना वाटलं. त्यामुळेही हातातून सिनेमे गेले. हास्यजत्रेत आम्ही फार काळ शूटिंग करत नाही. पण, त्याचं एक्पोजरच इतकं आहे की आम्ही खूप व्यग्र असल्याचं वाटतं. त्यामुळे हास्यजत्रेमुळे काही सिनेमे गेले आहेत. लंडनच्या अनेक फिल्म्स गेल्या. त्यांना वाटलं मी येऊच शकणार नाही, वेळ देऊ शकणार नाही. पण, मला असं वाटतं की देवाने आत्तापर्यंत हे घडवलेलं नाही. यामागेही काहीतरी कारण आहे. कदाचित मी काहीतरी वेगळं करावं असं त्याला वाटत असावं.”
आजही महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्राजक्ताला पाहण्यसाठी प्रेक्षक रोज नव्याने उत्सुक असतात, तर आता सारेजण तिच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.