माझिया प्रियाला प्रीत कळेना या लोकप्रिय मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे ‘मृणाल दुसानिस’ (Mrunal Dusanis). पहिलीच मालिका गाजल्यानंतर मृणालने तू तिथे मी, हे मन बावरे, अस्सं सासर सुरेख बाई यांसाख्या अनेक मालिकांमध्ये काम केले.
अभिनय क्षेत्रात एका मागोमाग एक यश मिळवत असताना खासगी आयुष्यात देखील तिने लग्नाची पायरी चढली. २०१६ मध्ये मृणालने ‘नीरज मोरे’ सोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर देखील ती तिचं काम नेटाने करत होती. पण काही वर्षानंतर हातात असलेल्या मालिका संपल्यावर मृणालने अमेरिकेत पतीसोबत संसार थाटला. गेली ४ वर्षे ती तिच्या पतीसह अमेरिकेतच वास्तव्यास आहे. दोन वर्षांपूर्वीच त्यांना एक मुलगी सुद्धा झाली. त्यांच्या मुलीचे नाव नुरवी असे आहे. तर आता तब्बल ४ वर्षांनी मृणाल तिच्या कुटुंबासोबत भारतात परतली आहे. भारतात येताच ती सर्वांची गाठभेट घेत आहे. तसेच अनेक मुलाखतींतून तिच्या चाहत्यांच्या देखील आणखी जवळ येत आहे.
तर आता भारतात परतल्यावर मृणालने नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. तर यावेळी तिने तिचं आणि नीरजचं लग्न कसं जुळलं याबद्दल खुलासा केला आहे. तसेच तिने तिच्या लग्नाच्या नात्याबद्दल देखील सांगितले.
मुलाखतीत मृणाल म्हणाली की, “आमचं अरेंज मॅरेज झालं आहे. माझ्या बाबांच्या ओळखीच्या एका काकांनी आम्हाला नीरजचं स्थळ सुचवलं होतं. त्यानंतर एके दिवशी त्याचा मला फोन आला, फोटो पाठवले. आमचं एकमेकांशी बोलणं झालं. मग आम्ही भेटायचं ठरवलं. आई-बाबा जे स्थळ सुचवतील ते चांगलंच असणार याची मला खात्री होती. म्हणून लग्न करण्याचा निर्णय घेतला.”
तसेच पुढे ती म्हणाली की, “आमचं बोलणं झाल्यावर तो अमेरिकेहून इथे आला. आम्ही कुठे बाहेरही गेलो नाही घरातच ३-४ मिनिटं बोलणं झालं. त्यानंतर आम्ही दोघं ६ महिने फोनवर कॉन्टॅक्टमध्ये होतो. तेव्हाच मी ठरवलं होतं की, हा मुलगा चांगला आहे आणि एकंदर मला तो आवडला होता. त्यानंतर मी एका कार्यक्रमासाठी परदेशी गेले असताना नीरज मला भेटायला आला होता. तेव्हा आमचं लग्न आधीच ठरलेलं होतं. असं साध्या सोप्या पद्धतीने अगदी लगेच सगळ्या गोष्टी जुळून आल्या.”
तर आता सध्या मृणाल भारतात परतल्यावर कोणत्या मालिकेत किंवा कोणत्या सिनेमात दिसणार का? याचीच सर्वांना उत्सुकता आहे.