आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यातून आपल्या पार्टनरसाठी वेळ काढणं खूपच कठीण होऊन जात. अशातच एकाच घरात राहून सुद्धा कित्येक दिवस एकमेकांची भेट होत नाही, एकमेकांशी समोरासमोर बोलता येत नाही याची खंत मात्र अनेकांना वाटते. अशीच खंत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या अभिनेत्याच्या बायकोला जाणवत आहे. आणि याबद्दल स्वतः तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सांगितले आहे.
टाईमपास सारख्या अनेक दमदार सिनेमातून आपल्या सगळ्याचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रथमेश परब (Prathmesh Parab). २४ फेब्रुवारीला प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरसोबत लग्नगाठ बांधली. इंस्टाग्रामवर झालेली ओळख, त्यानंतर मैत्री आणि मग मैत्रीचे रुपांतर प्रेमात असा सगळा प्रवास करत २ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजा यांनी लग्नगाठ बांधली. त्या आधी १४ फेब्रुवारीला या दोघांनी साखरपुडा केला. १४ फेब्रुवारी हा दिवस या दोघांसाठी खूपच खास आहे, त्याचं कारण म्हणजे १४ फेब्रुवारीला प्रथमेशने क्षितिजाला पहिल्यांदा मेसेज केला होता, १४ फेब्रुवारीलाच प्रथमेशने क्षितिजाला प्रपोज केले होते. आणि १४ फेब्रुवारी २०२४ ला या दोघांच्या नात्याला दोन वर्ष पूर्ण होणार म्हणून याच दिवशी त्यांनी केलेला साखरपुडा. त्यामुळेच १४ फेब्रुवारीची जागा यांच्या आयुष्यात थोडी खासच आहे. या दोघांचे लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडले.
प्रथमेश आणि क्षितिजा दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते दोघेही नेहमीच त्यांच्या रोजच्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांच्या चाह्त्यांसोबत शेअर करत असतात. क्षितिजा ही बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे, ती कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. त्या सोबतच तिला लिखाणाची देखील आवड आहे. प्रथमेश (Prathmesh Parab) हा त्याच्या शुटींगच्या कामामध्ये व्यस्त असतो आणि क्षितिजा ही तिच्या ऑफिसच्या कामात. त्यामुळे या दोघांना एकमेकांसोबत खूप कमी वेळ घालवतात. १४ एप्रिलला या दोघांच्या साखरपुड्याला २ महिने पूर्ण झाले. यानिमित्ताने दोघेही डेटवर गेले होते. याचे फोटो क्षितीजाने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केले. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, “एकाच घरात राहून शूट, नाईट शिफ्ट आणि ऑफिस यामुळे कित्येक दिवस एकमेकांना भेटता येत नाही आणि तरीही वेळ काढून तुम्ही तुमचे स्पेशल दिवस आवर्जून साजरे करता.”
त्यामुळे एका घरात राहूनसुद्धा अनेक दिवस एकमेकांना भेटता येत नाही, एकमेकांसोबत वेळ घालवता येत नाही याची खंत क्षितिजाने व्यक्त केली.