सध्या मराठी सिनेसृष्टीत नाटक, मालिका आणि सिनेमा यांवर नवनवीन प्रयोग केले जात आहे. त्यामुळे नव्या धाटणीचे नवे सिनेमे पाहताना रसिकवर्ग देखील तितकाच आनंदित आहे. रसिक प्रेक्षकांमुळे निर्माते आणि एकूणच संपूर्ण टीमला नवे विषय हाताळायला उत्साह येत आहे.
काही सिनेमे रुपेरी पडद्यावर आल्यावर सुपरहिट होतात तर काही सिनेमे प्रदर्शित होण्याआधीच त्या सिनेमाचा बोलबाला झालेला असतो. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी चर्चेत आलेले अनेक सिनेमे असतात. परंतू जागतिक पातळीवर झालेला बोलबाला आणि कौतुक खूपच क्वचितच पाहायला मिळते. तर सध्या असेच कौतुक ‘वल्ली’ या मराठी सिनेमाचे सर्वत्र सुरु आहे. स्वातंत्र्य आणि भावनिक मुद्द्यांवर बोलणारा हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे.
दिग्दर्शक मनोज शिंदे हा अनोखा विषय घेऊन वल्ली हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर घेऊन येणार आहेत. हा सिनेमा लिंगभावना या गहन विषयाभोवती फिरणारा आहे. देवीचा भक्त असलेला वल्ली स्वतःच्या अस्तित्वाच्या मुक्तीसाठी कसा झगडतो ते दाखवणारी ही कथा आहे. या कथेतील नायक वल्ली हा जोगता परंपरेचा अनुयायी असतो. तसेच ही कथा एका काळापुरती मर्यादित नसून वल्लीचा हा प्रवास तब्बल दशकभर सुरु असतो. याच काळात बदलत्या समाजातून तो स्वतःच्या स्वातंत्र्याचा शोध कसा घेतो हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
वल्ली या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण जालना आणि पुण्यात झाले आहे. महाराष्ट्राच्या मातीत बनलेला हा सिनेमा जागतिक स्तरावर देखील गाजला आहे. वल्ली या सिनेमातील दोन्ही प्रमुख कलाकारांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनय’ यासाठी नामांकनं मिळाली आहेत. एवढेच नाही तर वल्ली या सिनेमाची सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (SGIFF) मध्ये देखील निवड झाली आहे. तसेच वल्ली सिनेमाचा प्रीमियर या फेस्टिवलमध्ये दाखवला जाणार आहे.
त्यामुळे सध्या सर्व स्तरातून या सिनेमाचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे भरभरून कौतुक होत आहे.