स्वराज्यरक्षक संभाजी आणि सध्याची आई कुठे काय करते या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ‘अश्विनी महांगडे’ (Ashvini Mahangade). स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेतील राणूअक्का असो अथवा आई कुठे काय करते मालिकेतील अनघा असो, आपल्या दमदार अभिनयाने अश्विनीने तमाम रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.
सध्या आई कुठे काय करते मालिकेतील अनघाच्या भूमिकेशिवाय अश्विनी महांगडे तिच्या आगामी सिनेमाची देखील तयारी करत आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या तिच्या आगामी सिनेमातून ती पुन्हा एकदा एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. २०२४ साली प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात ती अहिल्याबाई होळकरांची भूमिका साकारणार आहे. मालिका आणि सिनेमांसहित अनेक माध्यमातून तिने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली.
कामाव्यतिरिक्त तिला ऐतिहासिक आणि धार्मिक गोष्टींमध्येही रस आहे. त्यामुळे अनेकद ती या विभागातील भूमिका पार पडताना दिसते. अश्विनी सोशल मीडियावर देखील कायम सक्रीय असते. त्यामुळे ती तिच्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यात ती तिच्या आयुष्यातील चांगले-वाईट असे बरेच अनुभव सांगत असते. अश्विनीने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ पाहून अश्विनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेली असल्याचे समजते. जेजुरी गडावर आणि सर्वत्रच मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदेपासून सुरु झालेला खंडोबा षडरात्र उत्सव चंपाषष्ठीपर्यंत असतो. कालच चंपाषष्ठी झाली, त्यामुळे यानिमित्त अनेक भक्त आवर्जून खंडोबाच्या निरनिराळ्या मंदिरांना भेट देत खंडेरायाचे दर्शन घेत असतात. याचनिमित्त अश्विनीने देखील जेजुरी गडाचे दर्शन घेतले. यावेळी तिला आलेला अनुभव तिने नुकतच तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला. तिचा हा अनुभव वाचून अनेकजण भारावून गेले.
अश्विनीने पोस्ट करत लिहिले की, “यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. अखेर देवाने गडावर दर्शनासाठी बोलावलं. इतक्या वेळा जेजुरीहून कुठेतरी कार्यक्रमानिमित्त जाणे झाले, गेल्या वर्षी मन मंदिरा गजर भक्तीचाचे वारीचे शूट जेजुरीच्या रस्त्यावर केले पण गडावर दर्शनासाठी जाणे झालेच नाही. मी जेव्हा तिथून जायचे आणि गड पाहायचे तेव्हा हेच मनात यायचे की देवाने अजून बोलावणे केलेच नाही. कधी योग येणार? कधी दर्शन होणार?” शेवटी तिने लिहिले की, “आणि देवांनी सांगावा धाडला.. दर्शन झाल्यावर जो आनंद झाला आणि तिथे जे जाणवले ते मांडता येणे कठीण.”
अशारितीने यंदाच्या चंपाषष्ठीनिमित्त अश्विनीच्या मनातील ही इच्छा पूर्ण झाली आहे. आणि जसं ती म्हणते तसं अखेर देवानं तिला दर्शनासाठी बोलावूनच घेतलं.