२०२२ साली प्रदर्शित झालेल्या भूल भुलैया २ सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर निर्मात्यांनी ‘भूल भुलैया ३’ची घोषणा केली होती. २००७ साली या सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना हा सिनेमा प्रचंड आवडला होता. त्याच बरोबर या सिनेमातील प्रत्येक पात्राला आणि प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
सिनेमाच्या पहिल्या भागातील अनेक कलाकार दुसऱ्या भागात दिसले नाही, त्यामुळे प्रेक्षक थोडे नाराज होते. पण दुसऱ्या भागातील प्रत्येक कलाकाराने ती उणीव भरून काढली. आता लवकरच या सिनेमचा तिसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या घोषणेपासून प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत, पण त्याहून यावेळी कोण-कोणते कलाकार दिसणार यासाठी अधिक उत्सुक आहेत. दरम्यान, कार्तिक आर्यन (Kartik Aryan) याने त्याच्या सोशल मीडियावर या सिनेमातील प्रसिद्ध गाणं शेअर करून सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत मोठी घोषणा केली.
नुकताच कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विद्या बालन आणि कार्तिकच्या भूल भुलैया २ मधील ‘आमी जे तोमार’ गाण्याचे मिश्रित व्हर्जन आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आणि हे घडत आहे. आणि मंजुलिका भूल भुलैयाच्या दुनियेत परत येत आहे. विद्या बालनचे स्वागत करण्यासाठी सारेच खूप उत्सुक आहेत. त्यामुळे ही दिवाळी अधिकच धमाकेदार असणार हे निश्चित.”
कार्तिकने शेअर केलेल्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली. पोस्टवर कमेंट करून ते सिनेमाबद्दलची उत्सुकताही व्यक्त करत आहेत. मात्र, सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कार्तिक आर्यनने घोषणेमध्ये एवढेच सांगितले आहे की, हा सिनेमा यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ शकतो. तर या ‘भूल भुलैया ३’ सिनेमाचे शूटिंग १० मार्चपासून सुरू होणार आहे.
तर या सिनेमात अक्षय कुमार दिसणार का? याकडे देखील प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. पण आता या सगळ्या गोष्टींवर पूर्णविराम लागला आहे. ‘अनीस बज्मी’हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी याबाबत खुलासा केला. भूल भुलैया ३ मध्ये अक्षय कुमार दिसणार की नाही? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “अक्षय कुमार या सिनेमात दिसणार नाही. यात फक्त कार्तिक आणि विद्या बालनच असणार आहेत. अक्षय कुमारबरोबरच तब्बूही या सिनेमात दिसणार नाही. मला अक्षय कुमारसोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. पण, दुर्देवाने मी अशी स्क्रिप्ट लिहिलेली नाही ज्यामध्ये आम्हाला एकत्र काम करता येईल.”
असे असले तरी या सिनेमाचे चाहते आणि कलाकारांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे.